आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी? पंढरपुरात अजित पवारांचं भन्नाट उत्तर

| Updated on: Nov 26, 2020 | 10:26 AM

जे काही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळतं, त्यात समाधान मानायचं असतं, असं म्हणत अजितदादांनी प्रश्न टोलवला

आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी? पंढरपुरात अजित पवारांचं भन्नाट उत्तर
Follow us on

पंढरपूर : कार्तिकी वारीची महापूजा केली, आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी येणार? अर्थात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कधी बसणार असा अप्रत्यक्ष प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पंढरपुरात विचारण्यात आला. त्यावर “जे काही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळतं, त्यात समाधान मानायचं असतं” असं म्हणत अजितदादांनी प्रश्न टोलवला. (Ajit Pawar was asked when shall he get opportunity of Ashadhi Vitthal Mahapooja)

“ते साकडं इथे नसतं घालायचं नसतं. विरोधात असलेल्या प्रत्येकाला सरकारमध्ये जावंसं वाटत असतं. आम्हीही विरोधात होतो, आम्हालाही वाटायचं आपण सरकारमध्ये जावं, लोकांची कामं करावी. त्यावेळी जे सरकारमध्ये होते, ते आता विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना वाटणारच हे सरकार जावं आणि आपल्याला संधी मिळावी. या राजकीय गोष्टी चालत असतात,
त्यात पांडुरंगाला ओढायचं काही कारण नाही. जे काही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळतं, त्यात समाधान मानायचं असतं आणि पुढे जायचं असतं, आपलं काम करायचं असतं” असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.

पंढरपुरात आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना सपत्नीक मिळत असतो. आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी येणार? असा आडून प्रश्न विचारत पत्रकारांनी अजित पवारांना मुख्यमंत्रिपदावर कधी विराजमान होणार, असे अप्रत्यक्षपणे विचारले. मुख्यमंत्री निवडण्याची वेळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आलीच, तर ते कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची निवड करतील, पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांची नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला होता.

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयरही उपस्थित होते. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांची उपस्थिती होती. (Ajit Pawar was asked when shall he get opportunity of Ashadhi Vitthal Mahapooja)

‘लस लवकर येऊ दे, जग कोरोनामुक्त होऊ दे’

पंढरीच्या विठुराया चरणी वंदन करताना अजित पवार यांनी कोरोनावर मात करण्यासाठी ‘लस लवकर येऊ दे आणि अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे’, असं साकडं घातलं. ‘अवघ्या जगासमोर कोरोनाचं संकट आहे. आपण या संकटाला सामोरं जात आहोत. मधल्या काही काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळत होतं. पण पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा काही बंधनं पाळणं, खबरदारी घेणं गरजेचं आहे’, असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलं. तसंच आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीलाही सरकारनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल अजितदादांनी वारकरी संप्रदायाचे आभार मानले. यंदा राज्यातील जनतेच्या वतीनं आपल्याला विठ्ठलाची पूजा करण्याचं भाग्य लाभलं. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिकी वारी परंपरेनुसारच होईल, असा विश्वासही अजितदादांनी यावेळी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“जयंत पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ माझ्यावर टीका करताना शरद पवारांच्या प्लसमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना सल्ला दिला की, उद्या मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आलीच, तर ते सुप्रिया सुळेंना संधी देतील. आता उपमुख्यमंत्री करायची वेळ आली, तेव्हा शरद पवार यांनी अजित पवारांना केलं… की जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांना केलं? अजित पवारांनी तर बंडखोरी केली होती, घर सोडलं, पक्ष सोडला होता. पण उपमुख्यमंत्री करायची वेळ आली, तेव्हा पवारांनी कोणाची निवड केली? कारण ही शरद पवारांची पार्टी आहे, त्यांना हवं त्याला ते मुख्यमंत्री करणार” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडली? अजित पवारांची फटकेबाजी

“लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विठुराया चरणी साकडं

(Ajit Pawar was asked when shall he get opportunity of Ashadhi Vitthal Mahapooja)