नितेश राणे अर्ध्या हळकुंडाने पिवळे, पोरांच्या हाती बॉम्ब, तलवारी देण्याची भाषा बंद करा; अमोल मिटकरी बरसले

निवडणूक तोंडावर आल्याने हे सर्व सुरू आहे का? तसंचं असेल, ज्यावेळी तुमच्याकडे सर्व गोष्टी बंद होतात, जनतेसमोर कोणत्या तोंडाने जायचं हा प्रश्न येतो, तेव्हाच या गोष्टी सुरू होतात. सरकारच्या योजना बाजूला राहिल्या आणि हिंदू खतरे में है.., असं नाही चालत. हा देश एक संघ राहिलेला आहे. विद्ध्वंस करून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं व्यक्तव्य म्हणजे काहीतरी डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाटतं, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

नितेश राणे अर्ध्या हळकुंडाने पिवळे, पोरांच्या हाती बॉम्ब, तलवारी देण्याची भाषा बंद करा; अमोल मिटकरी बरसले
amol mitkari
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 20, 2024 | 6:42 PM

अजितदादा गटाचे नेते अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मिटकरी यांनी पुन्हा एकदा राणेंवर टीका केली आहे. अजितदादा कामाची व्यक्ती आहे. नितेश राणे हे फुलटाईम रिकामे आहेत. नितेश अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत, अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी मीडियाशी संवाद साधताना नितेश राणे यांना सल्ला देत चांगलंच फैलावर घेतलं आहे.

नितेश राणेंनी अर्ध्या हळकुंडा सारखं पिवळं होऊ नये. बैठकीत काय चर्चा झाली माहिती घ्यावी. पत्रकारांचा माईक दिसला की फक्त उड्या मारू नये. माहिती घेऊन बोलावं. कोणत्याही धर्माच्या विरुद्ध आक्षेपार्ह व्यक्तव्य करत असतील, तर राष्ट्रवादी भूमिका मांडणारचं, असं अमोल मिटकरी यांनी निक्षून सांगितलं.

हे धंदे बंद करा

सर्वसामान्यांची पोरं कामाला लावायची आणि तुम्ही एसीमध्ये बसायचं, हे धंदे त्यांनी बंद करावे. महाराष्ट्रात ओला दुष्काळाचं सावट असतानाच शेतकऱ्यांच्याच पोराच्या हाती तलवारी, बॉम्ब देण्याच्या भाषा सुरू आहेत. ते बंद करावं, नाही तर ते स्वतः अडचणीत येतील. एक मित्र म्हणून हा त्यांना सल्ला आहे, असं मिटकरी म्हणाले.

राणेंना कामधंदा नाही

अजितदादा कामाची व्यक्ती आहे. नितेश राणे फुलटाईम रिकामे आहेत. त्या व्यक्तीला कामधंदा नाहीये म्हणून बडबड करत राहतो. अजितदादा अशा लोकांकडे लक्ष देत नाही. कुठल्याही धर्माच्या भावना दुखाऊ नये, हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शेतकरी हिंदू नाही का

नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतो म्हणजे शेतकरी हा हिंदू नाही का? शेतकऱ्यांच्या सोयाबीनला केंद्र सरकारने हमीभाव ठरवला. तो खर्चाच्यादृष्टीने कमी आहे. राज्याबाहेर सोयाबीनला ज्या ठिकाणी उच्चांक आहे, तो भाव केंद्र सरकारकडून मिळून द्यावा. तेव्हा हिंदू सुरक्षित राहील, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

तेव्हाच हिंदुत्व समजेल

आज हिंदूं शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होत आहेत. मग, हे हिंदुत्व महत्त्वाच नाही का?, तेच हिंदुत्व तुमच्यासाठी महत्त्वाचं. नितेश राणेना शेतशिवारात फिरायला लावा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या काय हे जेव्हा त्यांना समजणार तेव्हाच त्यांना हिंदुत्व समजेल, असंही ते म्हणाले.

हे कशासाठी

नितेश यांचे पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान असते. हे कशासाठी? आता पुन्हा पोलिसांना सुट्टी द्या, मुसलमान मारायचे. कोणी शिकवले हे? त्यांचं काहीतरी चुकतंय. एक तर त्यांच्या गोळ्या संपल्यासारखं वाटतंय, असा टोलाही त्यांनी लगावला.