बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात लागलेल्या भीषण आगीमुळे तीन बालकांचा मृत्यू झाला. त्यावर आता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात (SNCU) सोमवारी पहाटे भीषण आग लागली. व्हेंटिलेटरचा अचानक स्फोट होऊन पेटलेल्या या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा बाळांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या सहा बाळांपैकी काहींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर शेजारील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून ज्यांच्यामुळे हे घडलं त्यांना शिक्षा देणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
नुकताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, खरं तर ही घटना जी घडली आहे चौकशीअंती पुढे येईल. पण तांत्रिक चुकांमुळे किंवा एखाद्या अग्निशामक व्यवस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळे किंवा चुकीमुळे जे काही घडलं त्याचा रिपोर्ट येईल. त्यावर नंतर भाष्य करु. पण मला असं वाटतं की अशा घटना पुन्हा या राज्यामध्ये किंवा अमरावतीमध्ये होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत.
पुढे ते म्हणाले, अशा घटनावर राजकारण होऊ शकत नाही. गरीब-श्रीमंताचा इथे वाद नाही. तुम्ही अमरावतीच्या पालकमंत्री होत्या. तुम्ही हॉस्पिटलला पाहणी करण्याकरीता गेल्या होतात की राजकारण करण्याकरीता? तांत्रिक बाबी चुकीच्या असतील तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल. पोलीस कसुन चौकशी करत आहे.
सोशल मीडियावर देखील पोस्ट
दरम्यान, बावनकुळे यांनी सोशल मीडियावर देखील याबाबत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, ‘अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे. दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात असून, त्यांना लवकर आराम पडावा अशी सुविधा दिली जात आहे’ असे म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, ‘मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे असून, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजता लागलेल्या आगीत उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांपैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एक गंभीर आहे. आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. एसएनसीयूमध्ये कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार सुरू असतात. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या घटनेचे तीव्र दुःख व्यक्त करतो.