एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी निर्णायक मराठा आरक्षण आंदोलन करणार आहेत. सरकारचे शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच जरांगे यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठ्यांना किती दिवस वेड्यात काढणार, असा सवाल त्यांनी केला.

राम ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन करणार आहेत. त्यामुळे जरांगे यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांची माहिती घेणार आहेत. तसेच त्यांच्या आधीच्या मागण्यांवर सरकारने काय पावलं उचलली त्याचीही माहिती जरांगे यांना देणार आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, शिष्टमंडळ भेटीला येण्यापूर्वी जरांगे यांनी मीडियाशी संवाद साधला असून आम्हाला किती दिवस वेड्यात काढणार? असा सवाल केला आहे.
सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर काय म्हणतात ते बघूया. परंतु त्यांना एका गोष्टीची लाज वाटली पाहिजे की मराठा समाजाला पण किती दिवस येड्यात काढणार आहोत. प्रत्येक वेळेस आपण फक्त चर्चेला जातोय, वेळ मागतोय. गेल्या तीन वर्षात जे जे सरकार आले, त्यांच्या प्रत्येक शब्दाचा आम्ही सन्मान ठेवला. मात्र यावेळेस त्यांच्या जिव्हारी लागलं पाहिजे की मराठा समाजाला येड्यात काढून त्याच्यावर अन्याय करू नये, असं सांगतानाच सरकारचं शिष्टमंडळ फक्त जाणूनबुजून चर्चाच करत आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला आहे.
आता सुट्टी नाही
वारंवार आंदोलन उभं राहिलं की मराठा समाजाला शब्द देऊन, गोड बोलून फसवू या गैरसमजातून त्यांनी बाहेर यावं. 28 ऑगस्टच्या आत काय करता येईल ते सांगा. आता सुट्टी नाही, 29 चं आंदोलन थांबत नाही. आम्ही आंदोलन करणारच आहोत, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.
भुजबळांच्या लक्षात आलं की…
यावेळी त्यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. भुजबळ चाभरा माणूस आहे. त्यांच्याही लक्षात आलं की, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्या राज्यघटनेप्रमाणे आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यात आलं की मराठ्यांना विरोध करून आपला काही फायदा नाही. नाहीतर अस्तित्व उद्ध्वस्त होऊन जाईल, असं जरांगे म्हणाले.
काय म्हणाले होते भुजबळ?
छगन भुजबळ यांनी काल मीडियाशी संवाद साधताना मराठा आंदोलनावर भाष्य केलं होतं. मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही. त्यावर आम्ही काय बोलणार? सरकार त्यावर बोलेल आणि निर्णय घेईल. आम्ही जातगणना मागणी केली त्यावर सरकार काम करत आहे. ओबीसींमध्ये किती जाती आहेत, त्यावर सरकार निर्णय घेणार आहे. जेव्हा लढायचं तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देवून आम्ही राज्यात फिरलो. छगन भुजबळ हा काय घाबरला असा सवाल नाही. रकार आमच्या सोबत आहे म्हणून चर्चेतून आम्ही मार्ग काढतो आहोत, असं भुजबळ म्हणाले होते.
