“वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं, आता नवीन पर्याय देणार”

| Updated on: Jan 14, 2020 | 5:14 PM

वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे (Anandraj Ambedkar criticize VBA).

वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं, आता नवीन पर्याय देणार
Follow us on

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे (Anandraj Ambedkar criticize VBA). ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 26 व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं (Anandraj Ambedkar criticize VBA).

आनंदराज आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीला आम्ही पाठिंबा दिला होता, पण वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे. वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाज वंचित आघाडीबाबत निराश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आलेले ओबीसी नेते हे खरे ओबीसी समाजाचे नेते होते का? हा प्रश्न आहे. त्यामुळे वंचित आघाडी समाजापर्यंत पोचली का हाही प्रश्न आहे. वंचित सोबत जोडल्या गेलेल्या इतर घटकांचे मतदान वंचितला मिळाले का हा देखील मोठा प्रश्न आहे.”

वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेनंतर स्वतः आनंदराज आंबेडकर देखील अनेकदा वंचित बहुजन आघाडीच्या मंचावर पाहायला मिळाले होते. मात्र, आता त्यांनी घेतलेल्या या भूमिकेने चांगलीच खळबळ माजली आहे. यामुळे भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर या दोन्ही भावांमध्येच राजकीय द्वंद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन सेनेच्यावतीने आंबेडकरी जनतेला एकत्र करुन सत्तेपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही पक्षाची नव्याने बांधणी करत आहोत. ‘गाव तिथं, रिपब्लिकन सेना, घर तिथं रिपब्लिकन सैनिक’ अशी उभारणी आम्ही करणार आहोत, असंही आंबेडकर यांनी नमूद केलं. तसेच गटतटाच राजकारण माझ्या दृष्टीने संपलेला विषय असल्याचंही सांगितलं.

‘रिपब्लिकन सेना औरंगाबाद महापालिका निवडणूक लढवणार’

आनंदराज आंबेडकर यांनी वंचितवर टीका करताना वंचितला पर्याय उभं करणार असल्याचंही जाहीर केलं. यावेळी त्यांनी रिपब्लिकन सेना औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लढणार असल्याचीही घोषणा केली. या निवडणुकीसाठी रिपब्लिकन सेनेने उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.