अर्जुनरावांसोबत दोन महिन्यांपासून सेटलमेंट होती, नंतर फक्त नाटकं केली : दानवे

| Updated on: Jun 08, 2019 | 9:40 PM

रावसाहेब दानवेंना लोकसभेच्या निवडणुकीत चीत करणार असल्याचा चंग शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला होता. मात्र अनेक बैठकीनंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर अर्जुन खोतकर यांनी निवडणुकीत माघार घेतली.

अर्जुनरावांसोबत दोन महिन्यांपासून सेटलमेंट होती, नंतर फक्त नाटकं केली : दानवे
Follow us on

जालना : मंत्री अर्जुन खोतकर आणि माझ्यात निवडणुकीच्या दोन महिने आधीच सेटलमेंट झाली होती.. नंतर जे काही सुरु होतं ती फक्त नाटकं होती, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केला. जालन्यात रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळ्याल्याने जाहीर सत्कार ठेवण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. रावसाहेब दानवेंना लोकसभेच्या निवडणुकीत चीत करणार असल्याचा चंग शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला होता. मात्र अनेक बैठकीनंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर अर्जुन खोतकर यांनी निवडणुकीत माघार घेतली.

अर्जुन खोतकर यांनी जे केलं ती फक्त नाटकं होती. आमच्यात निवडणुकीच्या दोन महिने आधीच सेटलमेंट झाली होती, असा मोठा खुलासा रावसाहेब दानवे यांनी केला. विशेष म्हणजे हा गौप्यस्फोट केला तेव्हा अर्जुन खोतकरही व्यासपीठावर हजर होते. रावसाहेब दानवे यांच्या हाताला यश असून त्यांनी आतापर्यंत सगळ्या निवडणुका जिंकल्यात, त्यामुळे विधानसभेतही रावसाहेब दानवेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहू द्या अशी विनंती भाजपाध्यक्ष अमित शाहांकडे करणार असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हंटलंय.

“जनतेलाच देव मानतो, जनतेसमोरच हात जोडतो”

“पहिल्यापासूनच जनतेला देव मानलंय. मी देव आणि गुरुला माणणारा माणूस आहे. 35 वर्षांच्या सक्रिय राजकारणात लोकांनीच मला सांभाळलं. दुसर्‍या कोणत्याही देवाला काही मानत नाही. फक्त लोकांना हात जोडतो,” असं म्हणत दानवेंनी जनतेचेही आभार मानले.

“आपण कितीही मोठे झालो तरी लोकात राहतो, लोकांसारखे बोलतो, लोकांसारखे दिसतो, आपणच खरे आम आदमी आहोत.. हे  नातं कधी तुटू देणार नाही. पतंगाची दोरी तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे.. मी फार केले असं मी म्हणत नाही. लोकांचा विश्वास कायम ठेवला. जे काही करेल ते रावसाहेबच करेल. एवढं होऊन या लोकांनी राजकारणात आपल्याला विरोध केला नाही. ज्या दिवशी माझ्याबद्दल कार्यकर्त्यांत थोडी कुजबुज होईल, त्यादिवशी आपण निवृत्ती घेऊ. लिबांची खूप झाडं लाऊन ठेवलेत घरी, अर्जुनरावला बोलावू, या जेवायला… भाकरी तुम्ही आणा, भाजी मी आणतो.. पण सुडाचं राजकारण करणार नाही, विरोधी पक्षाला सोबत घेऊ, त्यांचे मार्गदर्शन घेऊ, विकासासाठी सतर्क राहू,” असं दानवेंनी म्हटलंय.

काँग्रेसचे खासदार बाळासाहेब पवार जीव लावायचे. इकडे ये, तुला आमदार, खासदार करतो, भाजपात काय करशील असं म्हणायचे. पण मी माझ्या जागेवर कायम असून खासदार आहे. पक्षासाठीच सतत काम केलं. जॉर्ड फर्नांडिस जेलमध्ये राहून निवडणूक जिंकले होते. मी रुग्णालयात उपचार घेत असूनही जिंकलो. काहीही चिंता नव्हती. कारण, सहा महिने अगोदरच सगळं नेटवर्क तयार केलं होतं, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

“… म्हणून टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली”

औरंगाबादमध्ये जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत करण्यासाठी दानवे रुग्णालयात होतो, असा आरोप शिवसेनेचे औरंगाबादचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. पण आजारपणाच्या अफवेवर पडदा टाकण्यासाठी मी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली, असा उल्लेखही दानवेंनी या कार्यक्रमात केला.

काही लोकांनी सल्ला दिला की खोतकरांपासून धोका होऊ शकतो, सावध राहा. पण जे आईचं होईल, ते भोप्याचं होईल. दोन महिने आधीच आमच्यात सेटलमेंट झाली होती. नंतरचं आमचं सगळं नाटक होतं. बरेच जण मध्यस्थी करायला आले. काही जण म्हणतात तुम्ही पडले असते, अर्जुनरावांना मी समजावलं म्हणून जमलं. पण आम्हीच ठरवलं होतं, दोघात कुणी तिसरा दलाल नको, असंही दानवेंनी सांगितलं.