“ठाण्यात आपल्याविरोधात लोक उभं राहाणं एकनाथ शिंदेंना रुचलं नाही, म्हणून उद्रेक”, ठाकरे गटाची सडकून टीका

| Updated on: Nov 15, 2022 | 11:00 AM

खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

ठाण्यात आपल्याविरोधात लोक उभं राहाणं एकनाथ शिंदेंना रुचलं नाही, म्हणून उद्रेक, ठाकरे गटाची सडकून टीका
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. माझ्याच विधानसभा मतदारसंघातील लोक माझ्या विरोधात उभे राहतात, हे झोंबल आहे. म्हणून ही प्रतिक्रिया आली. म्हणून हा उद्रेक झालाय, असं म्हणत अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, म्हणून अशी प्रतिक्रिया येत आहे, असंही ते म्हणालेत.

एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाण्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. ठाण्यातील किसननगर भागात दोन गटातील नेत्यांमध्ये राडा झाला. आधी भटवाडीत हाणामारी झाली. नंतर श्रीनगर पोलीस स्टेशन बाहेरही राडा झाला. यावर अरविंद सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अंधेरी पोट निवडणुकीवर सावंत म्हणाले…

अंधेरी पोट निवडणुकीसाठी मिंदे गट निवडणूक आयोगाकडे गेला. पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं गेलं. मात्र निवडणूक लढवलीच नाही. ते धाधांत खोटं बोलले. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात गेलो. चिन्ह आणि नाव आम्हाला परत मिळालं पाहिजे म्हणून याचिका केली, असं सावंत म्हणालेत.

एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री बैठक झाली. त्यावरही सावंत बोलले. शिंदे-फडणवीस यांना अशा उशीरा बैठकींची सवय आहे. वेशांतर करून त्यांनी ठाकरे सरकार पाडलं आणि सत्तेत बसले. हे फडणवीसांनीच विधीमंडळात सांगितलंय, माजी मुख्यमंत्री म्हणाले होते मला बदला घ्यायचा आहे, त्यांनी तसं केलं. त्यातून महाराष्ट्राला कळालं की ते सूडाची मूर्ती आहेत, असं अरविंद सावंत म्हणालेत.