“एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास” शेलारांचा वार

| Updated on: Aug 28, 2020 | 3:43 PM

"पदवीच्या अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनस्थितीशी खेळ करणाऱ्या राज्य सरकारने आता माफी मागण्याची वेळ आली आहे!" अशी मागणीही भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास शेलारांचा वार
Follow us on

मुंबई : “एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास झाला” अशा शब्दात माजी शालेय शिक्षण मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच असा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला. तर यूजीसीच्या सल्ल्याने परीक्षांच्या तारखा निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे. (Ashish Shelar and BJP Leaders criticize Thackeray Government after Supreme Court Decision on final year exams)

“कुलपती म्हणून राज्यपाल, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ञांची मते धुडकावली. यूजीसीला जुमानले नाही. मंत्रिमंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले? एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार…! ऐकतो कोण? सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला! महाराष्ट्रातील “पाडून दाखवा सरकारने” स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले!” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.

“पदवीच्या अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनस्थितीशी खेळ करणाऱ्या राज्य सरकारने आता माफी मागण्याची वेळ आली आहे!” अशी मागणीही भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

“सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालामध्ये शैक्षणिक बाबींना प्राधान्य देऊन आमच्या विद्यापीठांचा सन्मान राखला आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या निकषांवर कोणतीही तडजोड न करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन निर्णय घेण्यास राज्य सरकारांना अधिक वेळ मिळाला आहे!” असे माजी शालेय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे म्हणाले.

“अधिकार नसताना राज्यात परीक्षा रद्द करण्याचा चुकीचा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळले असून विद्यार्थ्यांना झालेल्या भयानक मानसिक त्रासाबद्दल उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

“अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत युवासेना आणि महाराष्ट्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. देशभरातील कुलगुरुंचे हेच मत होते. इतकंच काय महाराष्ट्रातील नेमलेल्या कुलगुरुंच्या समितीचेही हेच मत होते. मात्र युवासेनेच्या हट्टासाठी राज्य सरकार त्याबाबत एकतर्फी निर्णय घेत होते” अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“राज्य सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा विद्यार्थ्यांवर परिणाम झाला असता. परीक्षा नसल्याचा त्यांना आज आनंद झाला असता, पण भविष्यात त्यांची डिग्री बिनकामी ठरली असती. मात्र कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत, त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा फायदाच होईल. त्यांच्या डिग्रीला किंमत राहील” असे फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

फडणवीसांचा परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा, तर सुशांतप्रकरणी मुंबई पोलिसांकडे बोट

मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत विचारा, मग टीका करा, उदय सामंतांचं भाजपला उत्तर

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, तारखा निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना

(Ashish Shelar and BJP Leaders criticize Thackeray Government after Supreme Court Decision on final year exams)