आशिष शेलार ‘या’ निवडणुकीतून माघार घेणार? काय घडतंय मुंबईत?

विशेष म्हणजे मुंबईतल्या महत्त्वाच्या या निवडणुकीत पवार आणि शेलार यांच्या गटात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिंदे सेना या सर्वच पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आशिष शेलार या निवडणुकीतून माघार घेणार? काय घडतंय मुंबईत?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 12, 2022 | 10:55 AM

मुंबईः मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) कार्यकारिणीच्या निवडणुकीची सध्या मुंबईत चर्चा आहे. यंदा पहिल्यांदाच आशिष शेलार (Ashish Shelar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात युती झाली आहे. आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्जही भरला आहे. शेलारांचा सामना माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्याशी होणार अशी स्थिती आहे. मात्र शेलार या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशीष शेलार भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) चे खजिनदार होणार असल्याने त्यांना MCA निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे, असे म्हटले जात आहे.

लोढा समिती तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एका व्यक्तीला एकाचवेळी BCCI आणि स्थानिक संघटनेत वरिष्ठ पदावर राहता येत नाही. त्यामुळे आशीष शेलार हे MCA निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे.

18 ऑक्टोबर रोजी BCCI कार्यकारिणीची निवडणूक आहे. तर 14 ऑक्टोबरपर्यंत MCA निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत आहे.

शरद पवार-आशीष शेलार गटातील अमोल काळे आणि संजय नाईक यांनीही अध्यक्ष पदासाठी अर्ज भरले आहेत.

दरम्यान, माजी क्रिकेकपटू संदीप पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरही आक्षेप घेण्यात आला होता. कॉन्फलिक्ट ऑफ इंट्रेस्ट नियमानुसार हा आक्षेप घेतला गेला होता.

एमसीए निवड समितीचे अध्यक्ष सलिल अंकोला हे संदीप पाटील यांचे व्याही आहेत. त्यामुळे एमसीएचे सध्याचे सचिव संजय नाईक यांनी पाटील यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला.

मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला आहे. त्यामुळे संदीप पाटील यांचे अध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेतील स्थान वैध ठरले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनवर राजकीय वर्चस्व ठेवण्याची नेत्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे एमसीएच्या इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी युती केली आहे.

राजकारणातील कट्टर शत्रू असलेले नेते या निमित्ताने एकत्र आलेत. मात्र ही युती पाहून क्रिकेटपटूंनीदेखील नवा गट स्थापन केला आहे. संदीप पाटील यांनी हा गट स्थापन केला असून दोनच दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली.

विशेष म्हणजे पवार आणि शेलार यांच्या गटात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिंदे सेना या सर्वच पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.