भाजपाचा दिवाळी अजेंडा, 233 कार्यक्रम, मुंबई पिंजून काढणार, काय आहे प्लॅन?

| Updated on: Oct 20, 2022 | 3:12 PM

जे दुसऱ्यांच्या अपयशात जळतात, ते आनंदावर कसे दिवे लावतील... असा टोमणा आशिष शेलार यांनी लगावला.

भाजपाचा दिवाळी अजेंडा, 233 कार्यक्रम, मुंबई पिंजून काढणार, काय आहे प्लॅन?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः मुंबईकरांशी आमची नाळ जुळलेली आहे. मुंबईच्या लोकांना काय हवंय, हे आम्हाला माहिती आहे, असं वक्तव्य करत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिवाळीच्या (Diwali) कार्यक्रमांचं नियोजन सांगितलं. मुंबईतल्या महत्त्वाच्या भागात विशेषतः शिवसेना ठाकरे (Thackeray) गटाच्या बालेकिल्ल्यांत भाजपने दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. वरळी, गिरगाव, बांद्रा आदी भागांतील प्रमुख कार्यक्रमांसह संपूर्ण मुंबईत तब्बल 233 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा प्लॅन आखल्याचं म्हटलं जातंय.

भाजपची दिवाळी कशी?

19 ऑक्टोबरला वरळीतील जांभोरी मैदानावर मराठमोठ्या दीपोत्सवाचं उद्घाटन झालंय.
त्यानंतर संपूर्ण मुंबई शहरात गीत-संगीत, नृत्य, दिव्यांची आरास, स्पर्धा, आवश्यक गोष्टींचा बाजार या सगळ्यांचे विविध 233 कार्यक्रम घेतले जातील. नागरिकांची थेट सेवा आणि आनंदोत्सव भाजपच्या वतीने करतोय, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

शनिवारी 22 तारखेला 6.30 वाजता जोगेश्वरीत दीपसंध्या हा प्रकाशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. रविवारी 23 ऑक्टोबरला सकाळी 8.30 वाजता दहिसर येथे दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे. सोमवारी सकाळी 24 तारखेला 8 वाजता वांद्रे पश्चिम, गोरेगाव येथे दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं.

मंगळवारी दादर शिवाजी पार्क, राजा बढे चौक येथे तसेच पहाटे 6 वाजता गिरगावात दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे. तर 21 ऑक्टोबरला भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं दीपावली मिलन ठेवण्यात आलंय. ठक्कर्स बँक्वेट इथे हा कार्यक्रम आहे.

मुंबईकरांसाठी भाजप, उत्सवात भाजप, आनंदोत्सवात भाजप हे चित्र निर्माण झालंय. जे दुसऱ्यांच्या अपयशात जळतात, ते आनंदावर कसे दिवे लावतील… असा टोमणा आशिष शेलार यांनी लगावला. आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेत या कार्यक्रमांची घोषणा केली.

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातच भाजपचे जास्तीत जास्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भाजपचं हे अतिक्रमण असल्याचा आरोप केला जातोय. यावर आशिष शेलार म्हणाले, येथील आमदारांनी आतापर्यंत कोणता कार्यक्रम घेतला सांगा? वरळीत कार्यक्रम घेणं म्हणजे काय अतिक्रमण आहे का? येथील आमदारांना पेग, पेग्विन आणि पार्टीशिवाय दुसरं काही येतं का, असा सवाल त्यांनी केला.