PM मोदींचा नवा इन्स्टा Video आला, जनतेला केलेले खास आवाहन काय?
PM Modi Video : पंतप्रधान मोदी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. आज त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून देशवासियांना खास आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान खासकरून इन्स्टाग्रामवर सतत नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रीय हातमाग दिन (7 ऑगस्ट) पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक विशेष व्हिडिओ शेअर करत स्वदेशीचा संदेश दिला आहे. देशाचा इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि स्वदेशी आंदोलनाची आठवण करून देत त्यांनी पारंपरिक विणकर समाजाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी नागरिकांनी हातमाग उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय म्हणाले PM मोदी ?
पंतप्रधानांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले की, मित्रांनो, 7 ऑगस्ट 1905 हा दिवस आपण कधीही विसरू नये. याच दिवशी भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती. आत्मनिर्भर भारताची पायाभरणी याच आंदोलनातून झाली. ब्रिटिशांविरोधातील या लढ्यात संपूर्ण देश एकवटला होता. गेल्या आठवड्यात आपण सर्वांनी फ्रेंडशिप डे साजरा केला. त्याच उत्साहाने 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिनही साजरा करूया. हातमाग दिन साजरा करण्याचा अर्थ म्हणजे प्रत्येक गरीब आणि विणकर कुटुंबाचा उत्साह वाढवणे. चला, अशा छोट्या कुटुंबांना सक्षम बनवूया. हातमाग दिनानिमित्त प्रत्येकाने काही ना काही हातमाग उत्पादन नक्की खरेदी करावे.’
View this post on Instagram
यापूर्वीच्या व्हिडिओत विद्यार्थ्यांबाबत भाष्य
पंतप्रधानांनी याआधी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत देशातील युवकांशी संवाद साधला होता. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले होते की, ‘आज वाटतंय की फक्त तुमच्याशीच बोलावं. जंतर-मंतरवर जे काही घडलं ते देशाने आणि जगाने पाहिलं. काही खोडकर मुलांनी अत्यंत अशोभनीय भाषा वापरली. मला शिवीगाळ करण्यात आलीच, पण माझ्या स्वर्गीय आईलाही लक्ष्य करण्यात आलं.’
पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले होते की, ‘लहानपणी चुका होतात आणि त्या सुधारण्याची संधीही असते. समाजात जो संताप आहे, तो मला पूर्णपणे समजतो. आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, हा एक सांस्कृतिक धक्का आहे. पण ही वेळ त्यांना दूर लोटण्याची नाही, तर त्यांना जवळ घेऊन योग्य दिशा दाखवण्याची आहे.’
