‘बाळासाहेब असते तरी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असता!’, अशोक चव्हाणांचा दावा

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बाळासाहेब ठाकरे असते तरी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असता, असं म्हटलंय. नांदेडमध्ये आज बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत चव्हाण यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

बाळासाहेब असते तरी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असता!, अशोक चव्हाणांचा दावा
अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 5:26 PM

नांदेड : शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभरातून सर्वपक्षीय नेते बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. एकीकडे बाळासाहेब असते तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) झालीच, नसती अशी टीका भाजप नेत्यांकडून केली जात आहे. तर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी बाळासाहेब ठाकरे असते तरी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असता, असं म्हटलंय. नांदेडमध्ये आज बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत चव्हाण यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या शिबिराचं उद्घाटन आज अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी बोलताना बाळासाहेब असते तरी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असता. उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या भूमिकेमागची प्रेरणा ही बाळासाहेबांचीच असल्याचा दावाही अशोक चव्हाण यांनी केला आहे.

सुधीर मुनगंटीवारांचा महाविकास आघाडीवर निशाणा

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. त्याचबरोबर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्नही केला. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी होऊ शकली नसती, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे.

त्याचबरोबर ‘ज्या आघाडीला सुरुवातीला महाशिव आघाडी असं नामकरण केलं जाणार होतं, त्याऐवजी शिव या शब्दाला ज्यांनी विरोध केला, त्यांच्यासोबत बाळासाहेब कधीच गेले नसते. विचाराच्या आधारावर एक राजकीय पक्ष निर्माण झाला होता. काँग्रेससोबत जाण्याऐवजी मी शिवसेना बंद करेल, मी पक्ष विसर्जित करेल इतकी तिखट भूमिका ठाकरे यांची होती. भाजप आणि शिवसेनेच्या विचारात सामर्थ्य होतं. सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष कधी एकत्र आले नव्हते’, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

राजकारणातील मॉडल्स गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रं काढणं थांबवलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी, नरसिंह राव आणि सीताराम केसरी हे राजकीय पटलावर आले. त्यावेळी व्यंगचित्रासाठीची ही मॉडेल्स मी मिस केली असं बाळासाहेब म्हणायचे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. अमित शहा आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत… बाळासाहेब असते तर यांच्यावर त्यांनी हातात कुंचला घेऊन नक्कीच फटकारे लगावले असते, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

इतर बातम्या :

‘मोनिका, ओह्ह माय डार्लिंग’ नेव्हीच्या सैनिकांनी खरंच हे गाणं रिहर्सलमध्ये वाजवलं? बघा अफलातून Video

मुंबईतील पहिल्या ‘सेफ स्कूल झोन’चा प्रयोग यशस्वी; 93 टक्के विद्यार्थ्यी म्हणाले, पूर्वीपेक्षा रस्त्यावरून चालणे अधिक सोपे