पूर्ण श्टोरी का सांगितली नाही? अतुल सावेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, मोरेश्वर सावेंच्या भूमिकेवरुन वाद

| Updated on: Jun 09, 2022 | 12:40 PM

औरंगाबादमधील भाजप नेते आणि स्व. मोरेश्वर सावे यांचे पुत्र आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

पूर्ण श्टोरी का सांगितली नाही? अतुल सावेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, मोरेश्वर सावेंच्या भूमिकेवरुन वाद
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते असे म्हणणाऱ्यांना औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. हे बोलताना त्यांनी औरंगाबादचे तत्कालीन शिवसेना नेते स्वर्गीय मोरेश्वर सावे (Moreshwar Save) यांचाही उल्लेख केला. पण सावे यांचे पुत्र आणि आता भाजपात असलेल्या  आमदार अतुल सावे (MLA Atul Save) यांनी उलट मुख्यमंत्र्यांनाच सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी माझे वडील बाबरी मशीद पाडायला गेले होते, ही सांगितलेली स्टोरी अर्धीच आहे. पूर्ण स्टोरी तर पुढेच आहे. पण मुख्यमंत्र्यांनी त्या पुढे काय घडलं हेच सांगितलं नाही, असा दावा सावेंनी केलाय. बाबरी मशीद पाडण्यासाठी औरंगाबादहून एक संपूर्ण ट्रेन भरून कारसेवक गेले होते. त्यात माझे वडीलदेखील होते. त्या वेळी शिवसेना-भाजप किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना वेगवेगळ्या नव्हत्या. त्या एकाच मिशनसाठी काम करत होत्या. मात्र बाबरी मशीद पाडण्याचं काम करून आलेल्या माझ्या वडिलांना शिवसेनेनं काय वागणूक दिली, हे जगजाहीर होणं आवश्यक आहे, असं अतुल सावे म्हणाले. मुंबईत ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरेंचं वक्तव्य काय ?

शिवसेनेचं हिंदुत्व ठसवून सांगताना काल औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ शिवसेनेनं हिंदुत्वासाठी काय केलं आणि भाजपनं काय केलं हे एकदा खुल्या मंचावर होऊन जाऊ द्या… आता फडणवीस सांगत आहेत बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते… मग मला सांगा संभाजीनगरचे मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते का… नव्हते गेले तर तुमच्याकडे आलेले त्यांचे चिरंजिव अतुल सावे यांनी सांगावं की मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते… कुणाला हिंदुत्व शिकवताय. बाबरी पडल्यानंतर अडवणी, अटलजी यांचं स्टेटमेंट आहे. हा इतिहास काही वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली नसती, अमरनाथ यात्रेवर गंडांतर आलं, काश्मिरी पंडितांच्या मागे शिवसेनाप्रमुख उभे राहिले नसते… तर दिल्लीच्या तख्तावर आज तुम्ही हिंदुत्वाच्या जोरावर बसले असता काय? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

मोरेश्वर सावेंचे पुत्र अतुल सावेंचा आरोप काय?

औरंगाबादमधील भाजप नेते आणि स्व. मोरेश्वर सावे यांचे पुत्र आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले ,’ मुख्यमंत्र्यांनी काल स्वर्गीय मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला. अतिशय दुःखद घटना आहे. माझे वडील कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. मात्र अयोध्येला जाऊन आल्यावर ते जे प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडते होते, ते शिवसेनेच्या नेत्यांना आवडले नाही. त्यांनी वडिलांचं खच्चीकरण केलं. त्यांना लोकसभेचं तिकिटही दिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अर्धीच स्टोरी सांगितली. पूर्ण स्टोरी का नाही सांगितली? असा माझा प्रश्न आहे. त्यांना लोकसभा उमेदवारीतून का डावलण्यात आलं? लोकांनी त्यांना जी धरमवीर पदवी दिली होती, ती का स्वीकारली नाही? उलट त्यांचं खच्चीकरण केलं. याचं उत्तर उद्धव ठाकरे देणार का? असा सवाल अतुल सावे यांनी केला.