इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावासाठी राडा, एमआयएमचे 20 नगरसेवक निलंबित

| Updated on: Jun 13, 2019 | 4:24 PM

सतत होणाऱ्या वादामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या औरंगाबाद महापालिकेत पुन्हा एकदा भीषण गोंधळ झाल्यामुळे औरंगाबाद महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावासाठी राडा, एमआयएमचे 20 नगरसेवक निलंबित
Follow us on

औरंगाबाद : अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ झाला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला टाळाटाळ केल्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबाद महापालिकेतील राजदंड पाळण्याचा प्रयत्न करून अभूतपूर्व गोंधळ घातला. यामुळे एमआयएमच्या 20 नगरसेवकांना निलंबित करणयात आलंय. सतत होणाऱ्या वादामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या औरंगाबाद महापालिकेत पुन्हा एकदा भीषण गोंधळ झाल्यामुळे औरंगाबाद महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

ज्या सभागृहात औरंगाबाद शहरातील जनतेचे प्रश्न मांडले जावेत अशी अपेक्षा असते, त्याच महापालिकेत औरंगाबाद महापालिकेच्या नगरसेवकांनी मोठा गांधळ घातला. नागरसेवकांच्या या गोंधळामुळे औरंगाबाद महापालिकेला राज्यातील सर्वाधिक संवेदनशील अशी ओळख निर्माण झालीय आणि आजच्या गोंधळाने या ओळखीवर शिक्कामोर्तब केलं.

राजदंड पळवण्यासाठी नगरसेवकांचा राडा

गोंधळात एमआयएमचे नगरसेवक आघाडीवर होते, तसेच भाजपचे नगरसेवक सुद्धा आघाडीवर दिसले. भाजपच्या नगरसेवकांनी पाण्याच्या मागणीसाठी गोंधळ घालायला सुरुवात केली, तर एमआयएमच्या नगरसेवकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात यावा या मागणीसाठी गोंधळ घालायला सुरुवात केली. गोंधळ इतका विकोपाला गेला की या नगरसेवकांनी महापौरांच्या समोर ठेवलेला राजदंड पळवला, त्याचवेळी भाजपच्याही नगरसेवकांनी राजदंड खेचायला सुरुवात केली. तेवढ्यात शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजदंड परत मिळवण्यासाठी खेचाखेची सुरू केली.

नगरसेवकांची सुरु असलेली खेचाखेची आणि अभूतपूर्व गोंधळ थांबवण्यासाठी महापौरांनी अनेकवेळा आदेश दिला. मात्र नगरसेवकांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. महापौरांनी सुरक्षा रक्षकांना पाचारण केलं तरीही नगरसेवक थांबायला तयार नव्हते. शेवटी महापौरांनी पोलिसांना पाचारण केलं. पण तरीही नगरसेवक थांबायला तयार नव्हते. शेवटी वैतागलेल्या महापौरांनी सुरुवातीला 5, नंतर 6 आणि शेटवी तब्बल 20 नगरसेवकांना निलंबित केलं. निलंबित केल्यानंतरही नगरसेवक सभागृहाच्या बाहेर निघायला तयात नव्हते. शेवटी पोलिसांनी एका-एका नगरसेवकांना अक्षरशः उचलून सभागृहाच्या बाहेर काढलं.

औरंगाबादचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी

अनेकांना प्रश्न पडलाय की एमआयएमचे नगरसेवक इतके आक्रमक का झाले? याला पार्श्वभूमी आहे लोकसभा निवडणुकीची… ज्या इम्तियाज जलील यांच्या रूपाने एमआयएमने विधानसभेत प्रवेश केला, तेच इम्तियाज जलील औरंगाबाद लोकसभेत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून खासदार झाले. हा अपमान पचवणं शिवसेनेसाठी कठीण जात आहे. औरंगाबादची शिवसेना अजूनही इम्तियाज जलील यांना खासदार मानायला तयारच नाही.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात समृद्धी वाघिणीच्या बछड्यांचा नामकरण सोहळा होता. या सोहळ्याला नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांना ना सन्मान दिला, ना निमंत्रण. वैतागलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी उद्यानाच्या गेटवरच निदर्शने केली. एमआयएम एवढ्यावरच थांबली नाही, तर उद्यानातील बछड्यांना विशिष्ट एका धर्माची नावे का दिली असाही सवाल एमआयएमने विचारला. यामुळे वातावरण आधीच तापलं होतं आणि आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव नाकारण्यात आला राडा झाला.

महापालिकेतील आतापर्यंतचे गोंधळ

औरंगाबाद महापालिकेत यापूर्वीही अनेकवेळा असेच गोंधळ झाले आहेत. 2015 पासून आजपर्यंत औरंगाबाद महापालिकेत तब्बल सात अभूतपूर्व गोंधळ झाले. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याने अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला विरोध केला म्हणून सभागृहातच नगरसेवकांनी मारहाण केली होती. एमआयएम नगरसेवकांनी वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहायला नकार दिला त्याही वेळी प्रचंड गदारोळ झाला. 2016 मध्ये मुस्लीम वस्त्यात पाणी मिळत नसल्याच्या कारणावरूनही एमआयएमने राजदंड पाळवला होता.

औरंगाबाद शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी शंभर कोटी मंजूर झाले, ते वाटपात अन्याय होत असल्याच्या कारणावरूनही महापालिकेत गदारोळ झाला. समांतर जलवाहिणीला विरोध करण्यासाठी एमआयएम, काँग्रेस आणि भाजपनेही औरंगाबाद महापालिकेत अनेकवेळा गोंधळ घातला.

औरंगाबाद महापालिकेत सध्या शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षात प्रचंड मोठी धुमश्चक्री सुरू आहे. लोकसभेत शिवसेनेचा झालेला पराभव त्यांना खिलाडूवृत्तीने पचवता येत नाही आणि कधी नव्हे ते एमआयएम या पक्षाला लोकसभेत मिळालेलं अभूतपूर्व यश गिळता येत नाही. त्यामुळे सध्या औरंगाबाद महापालिकेसह संपूर्ण शहराचं वातावरण तणावपूर्ण बनलं आहे.