ठाकरे सरकार मनसेला घाबरते; भाजपच्या मोर्चाला परवानगी, आम्हाला का नाही? : अविनाश जाधव

| Updated on: Nov 26, 2020 | 11:42 AM

काँग्रेसला श्रेय मिळू नये, यासाठी शिवसेनेचा डाव आहे. महाराष्ट्रात आंदोलनं होणारच, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला

ठाकरे सरकार मनसेला घाबरते; भाजपच्या मोर्चाला परवानगी, आम्हाला का नाही? : अविनाश जाधव
Follow us on

ठाणे : भाजपच्या मोर्चाला परवानगी मिळते, पण मनसेच्या मोर्चाला मिळत नाही, कारण ठाकरे सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरतं, अशा शब्दात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी निशाणा साधला. भरमसाठ वीज बिल प्रकरणी मनसेने आज राज्यभरात ‘झटका मोर्चा’चे आयोजन केले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. (Avinash Jadhav criticizes Thackeray Government for denying permission to MNS Morcha)

“काहीही झाले तरी आंदोलन होणार. किती वेळा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणार? वीज बिलाविरोधात भाजप मोर्चा काढतं, तेव्हा त्याला परवानगी मिळते, मनसे मोर्चा काढतो, त्याला परवानगी देत नाहीत, हा कुठला न्याय? ठाकरे मनसेला घाबरते. हे सरकार उखडून फेकायचं आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल सवलतीचा निर्णय घेतला, मात्र काँग्रेसला श्रेय मिळू नये, यासाठी शिवसेनेचा डाव आहे. महाराष्ट्रात आंदोलनं होणारच, मला तडीपार करायचं तर करा” असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

“भरमसाठ वीज बिलाबाबत अनेक आंदोलने मनसेच्या वतीने करण्यात आली. प्रशासनाशी पत्र व्यवहारही करण्यात आला. मात्र, ऊर्जामंत्री आणि शासनाने त्याची दखल न घेता भरमसाठ आलेली बिले भरावीच लागतील, असे फर्मान काढले. सर्वसामान्य जनतेचा आक्रोश शासन दरबारी पोहोचवण्यासाठी मनसे भव्य मोर्चाचे आयोजन करत असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस उपयुक्तांनी बोलावून ठाणे जिल्हाबंदी करण्यात येणार असल्याचे सूचित केले होते.

ठाण्यात कॅडबरी जंक्शनपासून खोपट सिग्नल आणि टेंभीनाका मार्गे  जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर मनसेने मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चात ठाणे जिल्ह्याबाहेरील मनसैनिक मोठ्या संख्येने येणार असल्याने जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मनसैनिक जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना रोखण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत असल्यामुळे ठाणे पोलिसांनी जिल्हाबंदीचे आदेश दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून याला मंजुरी देण्यात आली.

दुसरीकडे, मुंबईत म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार होता. या मोर्चासाठी मनसेने परवानगी मागतली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे. त्यामुळे सुरक्षेचं कारण सांगत पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली. पण पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निवेदन देण्यास परवानगी दिली आहे.

संबंधित बातम्या –

मनसेच्या भव्य मोर्चावर ठाणे पोलिसांकडून ब्रेक, जिल्हाबंदीच्या आदेशामुळे गोंधळ

मनसेच्या मोर्चाला मुंबई पोलिसांचा नकार, पण मोर्चा काढण्यावर कार्यकर्ते ठाम

(Avinash Jadhav criticizes Thackeray Government for denying permission to MNS Morcha)