Bachchu Kadu : बंडखोरीचं गोड फळ मिळालं? रस्ते घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी बच्चू कडूंना क्लीन चीट
Bachchu Kadu Clean cheat : एकूण 1 कोटी 95 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार बच्चू कडू यांनी केला असल्याचा आरोप कडू यांच्यावर करण्यात आलेला होता. हे संपूर्ण प्रकरण कोर्टातही गेलं होतं.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) गटात सामील झालेल्या बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंबाबत (Bachchu Kadu News) महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Maharashtra Government formation) पडताच बच्चू कडूंच्या चौकशीची लगेच फाईल बंद झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. अस्तित्त्वातच नसलेल्या रस्त्याच्या कामाच्या बदल्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आलेला होता. एकूण 1 कोटी 95 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार बच्चू कडू यांनी केला असल्याचा आरोप कडू यांच्यावर करण्यात आलेला होता. हे संपूर्ण प्रकरण कोर्टातही गेलं होतं. बच्चू कडू यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फकवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
ते प्रकरण काय?
बच्चू कडू यांच्यावर वंचित बहुजन आघाडीने आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. अकोल्याचे पालकमंत्री असताना बच्चू कडू यांनी अस्तित्त्वात नसलेल्या रस्त्यावर निधी वळता करत एक कोटी 95 लाख रुपयांचा अपहार केला, असा आरोप करण्यात आलेला होता. तीन रस्त्याच्या कथित कामावरुन याची ठिणगी पडली होती. तसंच आपल्या मर्जीतील कामांना प्राधान्य देत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली कामं पालकमंत्री या नात्यानं त्यांनी डाववली, असा आरोप करण्यात आलेला होता.
क्लीन चीट का मिळाली?
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा कडू यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला होता. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशीही केली जात होती. अखेर या संपूर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं हे प्रकरण तथ्यहिन असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची ही फाईल आता पोलिसांनी बंद केल्याचं सांगितलं जातंय. एबीपी न्यूज नेटवर्कने याबाबतचं वृत्त दिलंय.
गायगाव ते रिधोरा रस्त्याच्या डोणारा लहान पूल आणि पोचमार्गाच्या कामात 50 लाख, इजिमाला जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोडरस्ता सुधार कामात 20 लाख, कुटासा ते पिंपळोत मार्गाला जिल्हा मार्ग दाखवत निधी वळवत 1.25 कोटी लाख रुपयांच्या अपहार केल्याचा आरोप कडू यांच्यावर करण्यात आलेला होता. दरम्यान, हे सगळे आरोप बच्चू कडू यांनी फेटाळले होते. वंचितकडून आपल्याबाबत गैरसमज पसरवला जात असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे वंचितने अकोला जिल्हा न्यायालयातही याप्रकरणी याचिका दाखल करत दाद मागितली होती. मात्र आता ही फाईलच पोलिसांनी बंद केल्याचं समोर आलंय.