लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचं काम उल्लेखनीय : बाळासाहेब थोरात

हा मल्टिस्टारर सिनेमा यशस्वी होणार. पाच वर्ष आनंदाने काम करु, असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचं काम उल्लेखनीय : बाळासाहेब थोरात
| Updated on: Jan 27, 2020 | 3:28 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत केलेलं काम उल्लेखनीय होतं. आजही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतील, आपल्या विचारांशी तडजोड करतील असं वाटत नाही, असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat on Raj Thackeray) यांनी व्यक्त केलं.

लोकसभा निवडणुकांच्या वेळी राज ठाकरेंनी मोदी सरकारविरोधात घणाघात करत अप्रत्यक्षरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली होती. या मदतीची जाणीव काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ठेवलेली दिसत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नेमकं काय विधान केलं माहित नाही. पण आम्ही पाच वर्ष एकत्रित काम करणार आहोत. हा मल्टिस्टारर सिनेमा यशस्वी होणार. पाच वर्ष आनंदाने काम करु, असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला.

हेही वाचा : मला ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणू नका, राज ठाकरेंची सूचना

मराठवाड्यातील योजना बंद झाली असं नाही. आम्ही आढावा घेत आहोत. भाजप विरोधी पक्षाची भूमिका वठवत असल्याने आंदोलन केलं जात आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी भाषणं केली, काम नाही. फक्त जाहिराती चांगल्या होत्या. आम्ही काम करु, चांगला न्याय देऊ, असं आश्वासनही बाळासाहेब थोरात यांनी दिलं.

संविधानाच्या चौकटीतच सरकार चालतं. ते सगळ्यांना बंधनकारक आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि संविधानाची बांधिलकी आहे. देशात संविधानाला धक्का लावण्याचं काम सुरु आहे, असा घणाघात थोरातांनी केला.

आम्ही थेट सरपंच निवडीबाबत काही अभ्यास केला आहे. त्यानंतर निर्णय घेऊ. सरपंच निवडून आले, पण खाली बहुमत नाही. त्यामुळे कामं होत नाहीत, अशा तक्रारी आहेत. हा अनुभव आल्यावर थेट सरपंच निवडीता निर्णय रद्द केला जात आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी (Balasaheb Thorat on Raj Thackeray) दिली.