संजय राठोडांचं मंत्रिपद मला द्या म्हणणाऱ्या नेत्याला बंजारा महंतांचा विरोध, म्हणाले…

| Updated on: Mar 12, 2021 | 3:08 PM

शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याऐवजी मला मंत्री करा. | Haribhau Rathod

संजय राठोडांचं मंत्रिपद मला द्या म्हणणाऱ्या नेत्याला बंजारा महंतांचा विरोध, म्हणाले...
संजय राठोड आणि उद्धव ठाकरे
Follow us on

वाशिम: संजय राठोड यांचे मंत्रिपद मला द्या, अशी मागणी करणारे माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांना बंजारा समाजातूनच विरोध होताना दिसत आहे. पोहरादेवी येथील बंजारा (Banjara) समाजाचे महंत सुनील महाराज यांनी हरिभाऊ राठोड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हरिभाऊ राठोड यांना वनमंत्रिपद दिले तर स्वागतच आहे. मात्र, ही समाजाची मागणी नसून त्यांची वैयक्तिक मागणी आहे, असे सुनील महाराज यांनी अधोरेखित केले आहे. (Haribhau Rathod want Sanjay Rathod forest ministry it’s personal demand not Banjara community)

ते शुक्रवारी वाशिममध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी सुनील महाराज यांनी हरिभाऊ राठोड यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. हरिभाऊ राठोड यांची ही मागणी वैयक्तिक आहे. हरिभाऊ यांचे वय आता 70 पेक्षा जास्त असून त्यांची तब्येतही बरी नसते, असे सुनील महाराज यांनी सांगितले. सुनील महाराज यांचे हे वक्तव्य पाहता हरिभाऊ राठोड यांना बंजारा समाजाचा पूर्णपणे पाठिंबा नसल्याचे प्रतित होत आहे.

काय म्हणाले होते हरिभाऊ राठोड?

शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याऐवजी मला मंत्री करा. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या आघाडीने 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ; उद्धव ठाकरेंचे वचन

हरिभाऊ राठोड यांनी सात मार्चला आणि 11 मार्चला अशी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याचं सांगत सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची आठवणही हरिभाऊ राठोड यांनी करुन दिली आहे. आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी काम केल्याचं सांगून आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात आहे. आपण भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व केल्यासं सांगत हरिभाऊंनी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल, असे हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटले आहे.

वनमंत्रिपदासाठी कोण-कोण शर्यतीत?

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतरच महाविकासआघाडीत लगेचच वनमंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरु झाले होते. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल. मंत्रिमंडळ विस्तारात वनमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याचं नाव निश्चित करतील, त्यालाच वनमंत्री पदाची लॉटरी लागेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, वनमंत्रिपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचं कळत आहे. तर मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळेल का यासाठी प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांचे नाव आघाडीवर आहे.

संबंधित बातम्या :

संजय राठोड यांचा राजीनामा, आता वनमंत्रिपदाची धुरा कोणाला?

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास पुढचे पर्याय काय?; वाचा सविस्तर

(Haribhau Rathod want Sanjay Rathod forest ministry it’s personal demand not Banjara community)