पोरगं सोडलं अन् नातूच काढला… ‘त्या’ प्रचारावरून अजित पवार संतापले

बारामतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भावनिक आवाहनावर अजित पवार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी केलेल्या "साहेबांची शेवटची निवडणूक" या आवाहनाला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पोरगं सोडलं अन् नातूच काढला... त्या प्रचारावरून अजित पवार संतापले
अजित पवार, नेते, राष्ट्रवादी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2024 | 1:01 PM

राज्यात निवडणुकीचा फिवर चढलेला असतानाच बारामतीचं राजकारणही ढवळून निघालं आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. युगेंद्र पवार यांना निवडून आणण्यासाठी पवार फॅमिलीच मतदारसंघात उतरली आहे. यावेळी मतदारांना भावनिक आवाहन केलं जात आहे. साहेबांची शेवटची निवडणूक आहे. नातवाकडे लक्ष द्या, असं आवाहन शरद पवार गटाकडून केलं जात आहे. या आवाहनामुळे अजित पवार यांच्या पायाखालची चांगलीच वाळू सरकली आहे. या आवाहनावर त्यांनी आज मीडियाशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार हे लोणी भापकर येथे आले होते. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधताना या आवाहनावर प्रतिक्रिया दिली. आता वेगवेगळे लोक भेटत आहेत. पलिकडच्यांच्या प्रचाराविषयी सांगत आहेत. सुप्रियाच्यावेळीही सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिलं. तो तुमचा अधिकार आहे. मला काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातावाकडे लक्ष द्या…. आयला म्हटलं कठिणच झालं. पोरगं सोडलं आणि यांनी नातूच काढलाय. मी मुलासारखाच आहे ना. पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. माझ्यात काय कमी आहे? मी काय कमी केलं आहे? असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना केला आहे.

काही वर्ष घासावी लागतात

मागं ज्यांनी कुणी लोकसभेला निर्णय घेतला तो मला मान्य आहे. पण आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आजच्या घडीला राजकारणात आठ दहा नावं प्रमुख आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अशी आठ दहाच नावं आहेत. यापेक्षा अधिक नावं नाही. इथपर्यंत पोहोचायला काही वर्ष घासावी लागतात. तेव्हा कुठे नेतृत्व तयार होतं, असं अजित पवार म्हणाले.

कितीदा शेवटची निवडणूक?

प्रत्येकवेळी सांगतात शेवटची निवडणूक आहे. यांची कितीदा शेवटची निवडणूक आहे, असा सवाल अजित पवार यांनी केला. पंतप्रधानांची काल पुण्यात सभा झाली. परंतु कालच्या सभेत फक्त विकास संदर्भात बोललं गेलं. मागच्या वेळेस थोडी गडबड झाली होती. मलाचं बारामतीच बघावं लागणार आहे. वयाचा विचार करून वय झाल्यानंतर मुलांच्या हातात कारभार दिला जातो. मी जेवढे काम करू शकतो तेवढे महाराष्ट्र राज्यात कोणताच आमदार करू शकत नाही. महाराष्ट्र राज्यात माझी ताकद वाढली तर त्याचा फायदा बारामतीला आणि पुणे जिल्ह्याला होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अजितदादांचा टोला

काही लोक म्हणतात दादाला इंग्रजी बोलता येत नाही. परंतु युगेंद्रला देखील मराठी बोलता येत नसल्याचे खाली बसलेला कार्यकर्ता म्हणाला. यावर अजित पवार म्हणाले, मला नाही येत इंग्रजी. त्याला म्हणावं 6.5 लाख कोटी मधला टिंब कुठं असतो? असा टोला अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांना लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us