‘भारत बंद’चे कारस्थान महाराष्ट्रात फसले, भाजपचा दावा; अनिल बोंडेंकडून शेतकऱ्यांचे अभिनंदन!

| Updated on: Sep 28, 2021 | 4:37 PM

शेतकऱ्याची पिळवणूक करून सहकाराच्या नावाखाली निर्माण झालेल्या आर्थिक साम्राज्यास संरक्षण देणाऱ्या या नेत्यांवर जनतेचा विश्वास राहिला नसल्यामुळेच आज महाराष्ट्रातील शेतकरी केंद्रातील मोदी सरकारच्या पाठीशी एकवटला आहे, असे डॉ. बोंडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

‘भारत बंद’चे कारस्थान महाराष्ट्रात फसले, भाजपचा दावा; अनिल बोंडेंकडून शेतकऱ्यांचे अभिनंदन!
अनिल बोंडे, माजी कृषीमंत्री
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजकीय हेतूने पुकारलेल्या भारत बंदचे आवाहन धुडकावून महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेने केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त केला. असा दावा भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला. तसंच त्यांनी शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. केंद्राचे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याच्या अपप्रचारास चोख उत्तर देऊन या कायद्यांविरोधातील राजकीय कारस्थान मोडून काढले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, काल देशभरात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात भारत बंद पाळण्यात आला. महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्षही त्यात सहभागी झाले होते. (Anil Bonde claims that Bharat Bandh agitation failed in Maharashtra)

डॉ. बोंडे यांनी पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबच्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या राजकीय आंदोलनास महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा पाठिंबा नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. केंद्राच्या कायद्याशी सुसंगत असे कृषी कायदे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. त्याने शेतकऱ्यांचे हितरक्षणच होत असल्याचा अनुभव शेतकरी घेत असल्याने या आंदोलनांचा फोलपणा शेतकऱ्याने ओळखला आहे. त्यामुळेच या कायद्यांविरोधातील भारत बंदच्या बेगडी आवाहनास विरोध करून व बंदचा फज्जा उडवून महाराष्ट्रातील शेतकऱ्याने व जनतेने केंद्र सरकारवरील विश्वासाची ग्वाही दिली आहे.

‘शरद पवारांनी दुटप्पी भूमिका घेतली’

शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या कायद्यांच्या संदर्भात सातत्याने दुटप्पी भूमिका घेतली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना बंधनमुक्त करा असे म्हणायचे आणि दुसरीकडे याच हेतूने तयार केलेल्या मोदी सरकारच्या कायद्यांना विरोध करायचा हा शरद पवारांचा दुतोंडीपणा शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. शेतकऱ्याची पिळवणूक करून सहकाराच्या नावाखाली निर्माण झालेल्या आर्थिक साम्राज्यास संरक्षण देणाऱ्या या नेत्यांवर जनतेचा विश्वास राहिला नसल्यामुळेच आज महाराष्ट्रातील शेतकरी केंद्रातील मोदी सरकारच्या पाठीशी एकवटला आहे, असे डॉ. बोंडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

‘सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाचा मुखवटा उघड’

या कायद्यांच्या विरोधातील भारत बंद आंदोलनास महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीने पाठिंबा दिला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही आंदोलनात उतरले होते. मात्र, राज्यात या आंदोलनाचा फज्जा उडाल्याने सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाचा मुखवटा उघड झाला आहे. सामान्य जनता सरकारसोबत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. शेतकरी हिताच्या विरोधातील कोणत्याच राजकीय कारवाया आता यशस्वी ठरणार नाहीत हेच या फसलेल्या आंदोलनाने दाखवून दिले आहे, असा टोलाही डॉ. बोंडे यांनी मारला.

नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली रॅली

केंद्र सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने सक्रीय भाग घेतला होता. अकोल्यात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी रिक्षा चालवली. या रॅलीत अकोला शहर जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बबनराव चौधरी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते साजीद पठाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

इतर बातम्या :

Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी; पिकांसह शेती खरवडून गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट

‘जयंत पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत’, शेती नुकसानाच्या पाहणीवेळी पंकजा मुंडेंची टीका

Anil Bonde claims that Bharat Bandh agitation failed in Maharashtra