संजय राठोड, भावना गवळींना पुन्हा पक्षात स्थान नाही, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट; जोमाने कामाला लागण्याचे यवतमाळच्या कार्यकर्त्यांना आदेश

| Updated on: Jul 15, 2022 | 3:41 PM

यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. त्यावेळी आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांना पुन्हा पक्षात स्थान नाही, असं स्पष्ट केलंय.

संजय राठोड, भावना गवळींना पुन्हा पक्षात स्थान नाही, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट; जोमाने कामाला लागण्याचे यवतमाळच्या कार्यकर्त्यांना आदेश
भावना गवळी, संजय राठोड
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार कोलमडलं आणि एकनाथ शिंदे स्वत: मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार गेले, तर अनेक खासदारही शिंदे गटात सामिल होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात भावना गवळी यांचा कल सुरुवातीपासूनच शिंदे गटाकडे असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पुन्हा एकदा पक्षाच्या बांधणीसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कामाला लागले आहेत. मुंबईसह, विभाग आणि जिल्हास्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी लावलाय. आज यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. त्यावेळी आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांना पुन्हा पक्षात स्थान नाही, असं स्पष्ट केलंय.

उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने कामाला लागा असे आदेश दिले आहेत. यावेळी ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीका केलीय. शिंदे सरकारनं नामांतराला स्थगिती दिली, हेच का हिंदुत्व? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना दिले होते, त्यालाही स्थगिती दिलीय. संजय राठोड आणि भावना गवळी यांना पुन्हा पक्षात स्थान नाही, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. राठोड यांच्या समाजाचे मंहत भेटायला आले होते त्यावेळी महंतांना शब्द दिला होता. त्याला घ्यायचं ठरवलं होतं. मात्र, गद्दारी करुन तो निघून गेला. जिल्ह्यात आजवर दुसरा आमदार का निवडून येऊ दिला नाही? असा सवालही ठाकरे यांनी केलाय.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचा प्रतोद कोण?

विधानसभेत बहुमत चाचणीच्या दरम्यान शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण असा सवाल उपस्थित झाला होता. आता हीच स्थिती संसदेतील पावसाळी अधिवेशनात निर्माण होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण खा. भावना गवळी ह्या शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी खा. राजन विचारेंची नियुक्ती होण्याचे पत्र लोकसभा सचिवालयाकडे खा. संजय राऊत यांनी दिले होते. मात्र, यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सोमवारपासून सुरु होत असलेल्या संसदीय पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचा प्रतोद कोण ? हा पेच निर्माण झाला आहे. विधानसभेतील चित्र स्पष्ट होत नसताना आता लोकसभेतील प्रतोद पदावरुन पुन्हा एकदा सेनेची कोंडी झाली का असा सवाल उपस्थित होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोमवारपासून संसदीय पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यामध्ये शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण असा सवाल उपस्थित होत आहे. कारण प्रतोदपदी असलेल्या भावना गवळी ह्या आता एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सावध पवित्रा घेत खा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या प्रतोदपदी राजन विचारे यांची नियुक्ती करण्याचे पत्र लोकसभा सचिवालयांकडे दिले होते. मात्र, कोर्टाच्या निर्णयापर्यंत आता सचिवालयाने ‘वेट अॅण्ड वॉच’ ती भूमिका घेतलेली आहे. याबाबत कोणतीही सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सोमवारी पावसाळी अधिवेशनात शिवसेना प्रतोद म्हणून कुणाची उपस्थिती दर्शविणार हा मोठा प्रश्न आहे.