Bihar | महाराष्ट्रात महिला मंत्री नाही, पण बिहारमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या तीन महिला कोण?

| Updated on: Aug 17, 2022 | 6:20 AM

बिहारमध्ये महाआघाडी अंतर्गत 31 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यात तेजस्वी यादवांच्या राजद पक्षाकडे सर्वाधिक 16 आमदारांना मंत्रिपद मिळाले. तर जदयूच्या 11 आमदारांनी शपथ घेतली.

Bihar | महाराष्ट्रात महिला मंत्री नाही, पण बिहारमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या तीन महिला कोण?
लेशी सिंग, अनिता सिंग, शीला कुमारी
Image Credit source: social media
Follow us on

पाटणाः महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) उलथापालथ झाली. एकिकडे महाराष्ट्रात भाजपच्या साथीने सरकार पाडलं गेलं तर दुसरीकडे भाजपला सोडचिठ्ठी देत बिहारमध्ये सरकार स्थापन झालं. महाराष्ट्रात सरकार (Maharashtra government) स्थापन झाल्यानंतर जवळपास 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र बिहारमध्ये सरकार स्थापनेनंतर आठवडाभरातच मंत्र्यांचा शपथविधी झाला. मंगळवारी बिहारमध्ये विविध आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची (Cabinet Ministers) शपथ घेतली. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली, पण त्यात एकाही महिलेचा समावेश नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. बिहारच्या मंत्रिमंडळाचा विचार करता येथे 3 महिला आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या तीन महिला नेमक्या कोण आहेत हे पाहुयात?

लेशी सिंग

पतीच्या हत्येनंतर राजकारणात प्रवेश करणाऱ्या लेशी सिंग यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बूटन सिंग हे लेशी सिंग यांचे पती. 2000 साली त्यांची हत्या झाली होती. त्यानंतर लेशी सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूकही जिंकली. त्यानंतर त्या सलग तीन वेळा आमदार झाल्या. पतीच्या खून्यांची हत्या करण्याचा कट त्यांनी रचल्याचा आरोप त्यांच्यावर होता. नितीश कुमारांसोबत त्या समता पार्टीत असल्यापासून आहेत. आता विद्यमान नितीश सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.

अनिता देवी

बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील नोखा येथील आमदार अनिता देवी. तीन वेळा आमदारकी भूषवली. महाआघाडीच्या सरकारमध्येही त्या मंत्री होत्या. राबडी देवींच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. बिहार सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

शीला कुमारी

शीला कुमारी या फुलपरास येथील आमदार आहेत. 2022 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे प्रभावी नेता कृपानाथ पाठक यांना पराभूत करत १० हजार ९६६ मतांच्या फरकाने विजयी झाल्या. त्यानंतर NDA सरकारमध्ये मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आले होते. आता नव्या सरकारमध्ये पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली असून नितीश कुमारांच्या कॅबिनेटमध्ये परिवहन खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

बिहारमध्ये राजद, जदयूचे किती मंत्री?

बिहारमध्ये महाआघाडी अंतर्गत 31 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यात तेजस्वी यादवांच्या राजद पक्षाकडे सर्वाधिक 16 आमदारांना मंत्रिपद मिळाले. तर जदयूच्या 11 आमदारांनी शपथ घेतली. काँग्रेसमधून 2, हमचा एक आणि अपक्ष 1 अशा आमदारांनी शपथ घेतली. तेजस्वी यादव यांना आरोग्य मंत्रालय देण्यात आले आहे. तर तेज प्रताप यांना पर्यावरण मंत्रालय देण्यात आले आहे.