राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर का टांगताय, भाजपच्या 12 महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्र लिहिल्यानंतर आता राज्यात लेटरवॉर सुरु झाल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्र लिहिल्यानंतर आता राज्यात लेटरवॉर सुरु झाल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. भाजपच्या दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांच्या लेटरहेडवरुन हे पत्र पाठवण्यात आलं आहे.
सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का? असा सवाल या पत्रातून विचारला आहे. राज्यात महिला अत्याचार वाढत असताना, महिला असुरक्षित असताना दिल्लीत अधिवेशन बोलावण्याची मागणी करून राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न का करताय? असा खरमरीत सवाल या महिला आमदारांनी विचारला आहे. थोड्याच वेळात हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं जाणार आहे.
सावित्रींच्या लेकींचे गाऱ्हाणे ‘मातोश्री ‘ ऐकणार का?
• राज्यात दररोज घडणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांकडे माननीय मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या महिला आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
• कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा शिवछत्रपतींनी कसा सन्मान ठेवला हे आपल्याला ठाऊक आहे. आपण राज्याचे प्रमुख असताना राज्यातील लेकीबाळींचा असाच सन्मान राखला जावा अशी आपली इच्छा नाही का?
• आपल्याला राज्यातील बऱ्याच घटनांची माहिती नसते असे कळते . त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपणास पत्राद्वारे कळवीत आहोत.
• साकीनाक्यानंतर महाराष्ट्रात घडलेल्या काही घटना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या नसाव्यात असे दिसते. पोचल्या असल्या तरी त्याची गंभीरता आपल्या कार्यालयाला कळली नसावी.
• राज्यातील महिला भयंकर असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत असताना संसदेच्या अधिवेशनाची मागणी करून राज्याची अब्रू थेट दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न आपण का करत आहात?
• केंद्र सरकारकडे बोटे दाखवून अशा घटनांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारला टाळता येणार नाही.
राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून, त्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा, अशा सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्या होत्या. राज्यपालांनी मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेकडे बोट दाखवलं होतं.
मुख्यमंत्र्यांचं जशास तसं उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला पत्रानेच उत्तर दिलं होतं. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं म्हणत विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली होती. उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, तशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांकडे करावी असं म्हटलं होतं.
संबंधित बातम्या
उद्धवजी, कायदा-सुव्यवस्था बिघडलेय, विशेष अधिवेशन बोलवा, राज्यपालांचा आणखी खरमरीत पत्र