आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करुन देणारा, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचं टीकास्त्र

| Updated on: Jun 25, 2021 | 2:24 PM

अटकेच्या भीतीने आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना आज काँग्रेसच्या पाठिंब्याने राज्यात सत्तेत आहे. राज्यातील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केलीय.

आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करुन देणारा, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचं टीकास्त्र
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप
Follow us on

मुंबई : आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना काँग्रेसच्या सहकार्याने राज्यातील जनतेला आणीबाणीचा अनुभव देते आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपला जात आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजप प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यावेळी उपस्थित होते. (Keshav Upadhyay criticizes Mahavikas Aghadi on emergency issue)

अटकेच्या भीतीने आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना आज काँग्रेसच्या पाठिंब्याने राज्यात सत्तेत आहे. राज्यातील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहेत. आणीबाणीत झालेले अत्याचार, सरकारी दडपशाही याचा प्रत्यय राज्यातील जनता सध्या घेत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने सध्या गळे काढले जात आहेत. मात्र आज राज्य सरकारच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही, लिहू शकत नाही अशी आणीबाणी सदृश स्थिती आहे, अशा शब्दात उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोड डागली.

भाजपचा राज्यभरात आणीबाणीविरोधी काळा दिवस

25 जून 1975 रोजी काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली. आणीबाणी लादून काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला. त्या काळया पर्वाची माहिती युवा पिढीला करून देण्यासाठी भाजपा युवा मोर्चातर्फे शुक्रवारी राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच पक्षाचे अनेक नेते यात सहभागी झाले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात युवा मोर्चातर्फे आणीबाणीच्या काळया पर्वाचे स्मरण करून देणारे कार्यक्रम होणार आहेत, असंही उपाध्ये यांनी नमूद केलं.

‘मंत्री घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले’

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन दिवसांपूर्वी केशव उपाध्ये यांनी मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. “राज्यातील आघाडीसरकार अपयशामुळे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले. ज्या जिल्हा परिषदांची केस होती तेथे आता पोटनिवडणूका लागल्या. मंत्री विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले. प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले’, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर उपाध्ये यांनी वडेट्टीवार आणि भुजबळ यांच्यावर टीका केलीय.

संबंधित बातम्या :

सुप्रिया सुळे म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या, महापौर मोहोळ म्हणाले, ‘तुमचं पुण्यात येणं कमी झालंय, तेव्हा…’

Breaking : नवी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद; नारायण राणे, आठवले, दरेकर उपस्थित राहणार

Keshav Upadhyay criticizes Mahavikas Aghadi on emergency issue