भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करा, घटकपक्ष राज्यपालांच्या भेटीला

| Updated on: Nov 02, 2019 | 11:54 AM

महाराष्ट्रातील राजकारणाची सद्यस्थिती पाहता आता सत्ता स्थापनेसाठी महायुतीतील इतर मित्रपक्षांनी पुढाकार घेतला आहे (BJP Component Party). घटक पक्षातील नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं, अशी विनंती केली.

भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करा, घटकपक्ष राज्यपालांच्या भेटीला
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाची सद्यस्थिती पाहता आता सत्ता स्थापनेसाठी महायुतीतील इतर मित्रपक्षांनी पुढाकार घेतला आहे (BJP Component Party). घटक पक्षातील नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं, अशी विनंती केली. विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागांवर विजय मिळाल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं, अशी मागणी घटक पक्षांनी राज्यपालांकडे केली (Component party leaders met Governor).

या मागणीसाठी घटक पक्षातील रासपचे नेते महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईचे सरचिटणीस अविनाश महातेकर, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत इत्यादी नेत्यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

‘शिवसेना भाजपचं सरकार येईल आणि एकमेकांची नाराजी दूर केली जाईल असं मला वाटतं. निवडणूक काळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यावेळी एकत्र येतील असं वाटत नाही. ही जनतेची फसवणूक आहे’, असं मत सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी व्यक्त केलं.

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 10 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

‘राष्ट्रपती राजवटीचा धमकी हा महाजनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणी व्यक्ती नाही. ते देशाचे एक स्तंभ आहेत. राष्ट्रपतींना या गोंधळात आणून त्यांच्या पदाची प्रतिष्ठा घालू नका. राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाही, त्यांचा मान ठेवा’, असा घणाघाती पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नियम दाखवत, जर सत्तास्थापनेला विलंब झाला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असा इशारा दिला होता. त्याला आज (2 नोव्हेंबर) संजय राऊत यांनी उत्तर दिलं. तसेच, शिवसेनेने मनावर घेतलं, तर बहुमताचं सरकार स्थापन करु, असंही संजय राऊत म्हणाले होते.