कार्यकर्त्यांमध्ये जात नसते, ज्याला तिकीट पाहिजे असतं त्यांना जात आठवते : नितीन गडकरी

| Updated on: Nov 29, 2020 | 3:12 PM

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राज्यातील पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेताना जातीपातीच्या राजकारणावरुन विरोधकांवर टीका केली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये जात नसते, ज्याला तिकीट पाहिजे असतं त्यांना जात आठवते : नितीन गडकरी
Follow us on

नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राज्यातील पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेताना जातीपातीच्या राजकारणावरुन विरोधकांवर टीका केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये जात नसते. पण ज्याला निवडणुकीत उमेदवारी हवी असते, तिकीट हवं असतं त्यांनाच जात आठवते, असा टोला नितीन गडकरींनी लगावला. तसेच लोक आपल्या सोयीसाठी जात पुढे करतात, मात्र त्यांनी जातीसाठी काय केलं हा मोठा प्रश्नच असतो, असंही ते म्हणाले (BJP Leader Nitin Gadkari criticize opponent on Caste Politics and Nagpur ).

नितीन गडकरी म्हणाले, “माणूस जातीने मोठा नसतो, कर्तृत्वाने मोठा असतो. भाजप जातीपातीचं राजकारण करत नाही. भाजपमध्ये सगळ्याच जातीचे कार्यकर्ते आहेत. मी अनेक जणांचे ऑपरेशन केले, त्यांना आरोग्याची सुविधा दिली. ही मदत करताना कुणाचीही जात विचारली जात नाही. कार्यकर्त्यांमध्ये जात नसते. ज्याला तिकीट पाहिजे असते त्यांना जात आठवते. आपल्या सोयीसाठी लोक जात पुढे करतात. मात्र, त्यांनी जातीसाठी काय केलं हा मोठा प्रश्न असतो.

“आपला परिवार हा आपला समाज, आपलं नागपूर आहे हे मी सांगितलं आणि कोरोनाच्या काळात मदत केली. सुरुवातीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट नव्हत्या. आम्ही पर्याय काढला आणि एका कंपनीला कीट बनवायला लावल्या आणि या कर्मचाऱ्यांपर्यंत पीपीई कीट पोहचवल्या. त्यात जाती पाहून देण्यात आल्या नाही. राजकारण जातीचं न करता विकासाचं आणि मानवतेचं करायला पाहिजे. मात्र आता ज्याप्रमाणे विरोधी पक्ष जातीचं राजकारण करत आहे त्यांना धडा शिकवायला पाहिजे,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

“ज्यांनी मतं दिली त्यांच्यासाठी तर काम कराच, पण ज्यांनी नाही दिली त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं काम करा”

नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना सांगितलं, “ज्यांनी मतं दिली त्यांच्यासाठी तर काम कराच, पण ज्यांनी नाही दिली त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं काम करा. राजकारणात आमदार किंवा मंत्री बनण्यासाठी आलो नाही तर समाजाची सेवा करण्यासाठी आलो हे लक्षात ठेवलं पाहिजे. खट्या बैलाला ज्याप्रमाणे चालण्यासाठी तुतारी लावतच राहावं लागतं, त्याप्रमाणे हे सरकार म्हणजे खटे बैलवालं सरकार आहे. यांना तुतारी घेऊन टोचतच राहावं लागतं तेव्हा काम होतं.”

“मिहानमध्ये 37 हजार 620 तरुण मुलांना रोजगार मिळाला”

“पदवीधरांच्या निवडणुकीत मी एकदा बिनविरोध निवडून आलो. या मतदारसंघाच्या माध्यमातून मला विदर्भाचे प्रश्न मांडता आले. मी विदर्भाच्या अनेक सिंचन प्रकल्पाचे मुद्दे अभ्यासले आणि ते मांडले. नागपूर इंटरनॅशनल विमानतळाचं टेंडर झालं होतं, मात्र सरकार बदललं आणि काम बंद झालं. मिहानच्या माध्यमातून मी अनेक कंपन्या आणल्या. त्यातून रोजगार निर्मिती होत आहे. मिहानमध्ये 37 हजार 620 तरुण मुलांना रोजगार मिळाला,” असंही नितीन गडकरी यांनी नमूद केलं.

नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागलं. भाजपचं सरकार असतं, तर एक महिन्यात हे काम झालं असतं, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या :

स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी कायद्याविरोधात आक्रमक, नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न

‘त्या’ महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

नितीन गडकरींचा अभिनव उपक्रम, खादीचे चप्पल-बूट लाँच

BJP Leader Nitin Gadkari criticize opponent on Caste Politics and Nagpur