राजकारण चंचल नसतं, शिवसेनेची विचारधारा चंचल झालेय; दरेकरांचा संजय राऊतांना टोला

| Updated on: Jun 13, 2021 | 3:55 PM

राजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेच्याबाबतीत ही गोष्ट घडत आहे. | Pravin Darekar

राजकारण चंचल नसतं, शिवसेनेची विचारधारा चंचल झालेय; दरेकरांचा संजय राऊतांना टोला
प्रविण दरेकर आणि संजय राऊत
Follow us on

मुंबई: राजकारण हे कधीच चंचल नसतं, राजकीय नेते हे चंचल असतात. शिवसेनेची विचारधाराही अशीच चंचल झाली आहे, अशी उपरोधिक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. संजय राऊत यांनी चंचल राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असे भाष्य केले होते. या वक्तव्याला प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. (BJP leader Pravin Darekar slams Shivsena)

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत बोलतात त्याप्रमाणे राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेच्याबाबतीत ही गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी त्याचा विचार करावा, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले.

तसेच शिवसेनेला पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र, अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही, याकडेही प्रविण दरेकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची टोलवाटोलवी

मराठा आंदोलनकर्त्यांनी त्यांची ताकद दिल्लीत दाखवण्याची गरज आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील पत्रकारपरिषदेत म्हटले होते. ‘एक लाख, एक मराठा’ ही ताकद दिल्लीत पंतप्रधानांसमोर दाखवली पाहिजे. राज्यात मराठा आरक्षणाला सर्वांचाच पाठिंबा आहे, असे राऊत यांनी म्हटले होते.

यावरुन प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका बदलल्याचे दिसत आहे. आधी शिवसेना संभाजीराजे यांचं समर्थन करत होती. पण आता संजय राऊत म्हणत आहेत की, त्यांनी दिल्लीत ताकद दाखवावी. ही एकप्रकारे टोलवाटोलवी सुरु असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले.

‘आम्ही हात जोडून विनंती केलीय, आता निर्णय पंतप्रधान मोदी घेतील’

मराठा आरक्षणप्रश्नी काढण्यात येणारा मोर्चा हा दिल्लीत काढायला हवा. मराठा आरक्षणाबद्दल आम्ही हात जोडून विनंती केली आहे. मात्र आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. मराठा आरक्षणाप्रश्नी जर मोर्चा निघणार असेल तर तो दिल्लीत काढायला हवा. महाराष्ट्रातल्या वातावरणात गढूळपणा आणू नये. एक मराठा लाख मराठा दिल्लीत दिसायला हवा, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या :  

गुलामसारखी वागणूक तुम्हाला मिळत होती तेव्हा शिवसेनेचा स्वाभिमान कुठं होता? राम कदम यांचा सवाल

सत्ता असेल किंवा नसेल आम्ही गुलामगिरीत जगत नाही, शिवसेनेसाठी स्वाभिमान महत्वाचा: संजय राऊत

Maratha Reservation | आम्ही हात जोडून विनंती केलीय, आता निर्णय पंतप्रधान मोदी घेतील : संजय राऊत

(BJP leader Pravin Darekar slams Shivsena)