सत्तास्थापनेचा दावा नाही, ‘या’ कारणासाठी भाजप नेत्यांची राज्यपालांशी भेट

| Updated on: Nov 07, 2019 | 3:49 PM

चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली

सत्तास्थापनेचा दावा नाही, या कारणासाठी भाजप नेत्यांची राज्यपालांशी भेट
Follow us on

मुंबई : भाजप-शिवसेना महायुतीला पुन्हा सरकार स्थापनेसाठी स्पष्ट जनादेश मिळालेला आहे. मात्र सत्तास्थापनेत विलंब होत असल्याने कायदेशीर चर्चेसाठी राज्यपालांची भेट घेतली, सत्तास्थापनेचा दावा केला नाही, अशी माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद (BJP Leaders met Governor at Rajbhavan) घेतली होती, यावेळी चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली.

लवकरात लवकर महायुती सरकार स्थापन व्हावं, अशी जनतेची इच्छा आहे. मात्र सत्तास्थापनेत विलंब होत असल्यामुळे काय करता येईल, याबाबत राज्यपालांशी कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांना महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थितीची माहिती दिली. आमची सविस्तर चर्चा झाली, आता भाजपचे नेते याविषयी निर्णय घेणार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर भाजप नेते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी ‘वर्षा’ निवासस्थानी रवाना झाले.

भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र ही वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आली. शिवसेना आमदारांच्या बैठकीत काय निर्णय घेते, कोणती रणनीती ठरवते, त्यानुसार भाजप पावलं (BJP Leaders met Governor at Rajbhavan) टाकणार असल्याचं म्हटलं जात होतं.

शिवसेनेच्या बैठकीत काय ठरलं?

मला स्वतःहून युती तोडायची नाही, युती कायम राहावी, ही माझी इच्छा आहे. सगळं गोडीने व्हायला पाहिजे. भाजपाध्यक्ष अमित शाहांसोबत 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. आता जो निर्णय आहे, तो भाजपने घ्यावा, अशी भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चेंडू भाजपच्या कोर्टात टाकला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांना निर्णयाचे सर्वाधिकार देण्यात आले असून खासदार संजय राऊतच केवळ पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील, असा निर्णय झाल्याचं सेनेच्या आमदारांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं. उद्धव ठाकरे 50-50 मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युलावर ठाम असल्याची माहिती आहे.

स्वतःहून युती तोडायची नाही, उद्धव ठाकरेंची भूमिका, पण मुख्यमंत्रिपदावर ठाम

उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेबाबत सर्व आमदारांचं मत आजमावून पाहण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. शिवसेना आपली पुढील राजकीय रणनीती ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले होते.

निकाल पंधरवडा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 15 दिवस उलटले. तरीही सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता 50-50 चा फॉर्म्युला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद यावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

शिवसेनेला आतापर्यंत 8 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 64 वर पोहचलं आहे. भाजपला 11 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 116 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

BJP Leaders met Governor at Rajbhavan