Rajya Sabha Election: संभाजी छत्रपतींनी माघार घेताच भाजपच्या तिसरी जागा लढवण्यासाठी हालचाली; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?

| Updated on: May 28, 2022 | 2:20 PM

Rajya Sabha Election: तिसरा उमेदवार देण्याबाबत खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच सुतोवाच केलं आहे. भाजपने अजूनही तिसरा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला नाही. भाजप कोणत्याही निवडणुकीत हरण्यासाठी उभी राहत नाही.

Rajya Sabha Election: संभाजी छत्रपतींनी माघार घेताच भाजपच्या तिसरी जागा लढवण्यासाठी हालचाली; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?
संभाजी छत्रपतींनी माघार घेताच भाजपच्या तिसरी जागा लढवण्यासाठी हालचाली; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना शिवसेनेने (shivsena) राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर संभाजी छत्रपती यांनी त्यांच्यात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये (cm uddhav thackeray) झालेल्या चर्चेचा तपशील उघड केला. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर आता भाजपने तिसरी जागा लढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपची मते आणि काही अपक्षांची मते, शिवाय आघाडीतील अपक्षांची मतेही आपल्याला मिळतील. त्यामुळे आपला तिसरा उमेदवार निवडून जाईल असं भाजपला वाटत आहे. म्हणून भाजपने तिसरा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपने तिसरा उमेदवार उतरवल्यास घोडेबाजार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजप नेमका कोणता उमेदवार देणार त्यावर पुढची सर्व गणिती अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे.

तिसरा उमेदवार देण्याबाबत खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच सुतोवाच केलं आहे. भाजपने अजूनही तिसरा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला नाही. भाजप कोणत्याही निवडणुकीत हरण्यासाठी उभी राहत नाही. आम्हाला ज्यावेळी अंदाज येईल तेव्हा आम्ही विचार करू. आमच्या सहयोगींची मिळून आमच्याकडे आता 31 मते आहेत. रमेश लटके यांचं निधन झालं. त्यामुळे हा कोटा 42 वरून 41वर येईल. त्या परिस्थितीत आम्हाला 10 मतंच कमी पडत आहेत. आमची मार्केटमध्ये पत आहे. घोडाबाजार न करता आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. देवेंद्र फडणीस यांनी पाच वर्षात अनेक मोठमोठी कामे केली आहेत. त्यामुळे आम्हाला दहा मते आरामात मिळतील. पण ही 31 मतं घेऊन आणि इतरांची दहा मते घेऊन तिसरी जागा लढवायची की नाही याचा निर्णय आम्ही केला नाही. त्याचा निर्णय केंद्र करते, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

वरिष्ठ नेते नकार देतील असं वाटत नाही

आमची यांच्यासारखी वन मॅन पार्टी नाही. आमची ऑल इंडिया पार्टी आहे. आमच्या पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याची व्यवस्था आहे. आम्हाला आमची मते विचारली जातात. आम्ही त्यांना सांगू की 31 मते आपल्याकडे आहेत. या तिघांकडे 31 मतेही नाहीत. इतरांच्या मतांच्या जोरावर आघाडी उमेदवार देत आहे. पण बघुया कोण मदत करते ते. पण आमची ब्रँडेड मते आहेत. असं असताना आम्ही तिसरी जागा लढायची नाही, असा सल्ला केंद्र आम्हाला देईल असं वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तिसरी जागा जिंकून दाखवूच

31 मे पर्यंत फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे आमचा निर्णय होईल. संसदीय समितीचं बोर्ड असतं. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतात. या बैठकीच्यावेळी आम्हाला विचारलं जातं. आज आमच्याकडे एकूण 31 मते आहेत. 41चा कोटा होईल असं वाटतं. 10 मते आम्हाला मिळतील. देवेंद्र फडणवीस यांचे रिलेशन आहेत. आम्हाला केंद्राने परवानगी दिली तर आम्ही तिसरी जागा जिंकूनच दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाडिक, तावडे यांच्या नावाची चर्चा

भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या दोन जागा येतात. या दोन जागांपैकी एका जागेसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं नाव फिक्स आहे. दुसऱ्या जागेसाठी विनय सहस्त्रबुद्धे, माजी मंत्री राम शिंदे आणि डॉ. अनिल बोंडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचेच माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आहे. विनोद तावडे यांचंही नाव राज्यसभेसाठी चर्चेत होतं. मात्र, दोन वर्ष संघटनात्मक बांधणीसाठी काम करायचं असल्याने राज्यसभेसाठी आपल्या नावाचा विचार करू नये असं स्वत: तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितल्याचं समजतं. त्यामुळे या स्पर्धेतून तावडे यांचं नाव मागे पडलं आहे. मात्र, ऐनवेळी दिल्लीतून एखादं नाव सूचवलं जाऊ शकतं, असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.