‘पवारांकडून बार मालकांसाठी सवलतीची मागणी, शेतकऱ्यांसाठीही एखाद्या पत्राची अपेक्षा आहे’, भाजपचा टोला

| Updated on: May 07, 2021 | 8:40 PM

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्या या पत्रावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार निशाणा साधलाय.

पवारांकडून बार मालकांसाठी सवलतीची मागणी, शेतकऱ्यांसाठीही एखाद्या पत्राची अपेक्षा आहे, भाजपचा टोला
atul bhatkhalkar
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर आज पुन्हा एकदा ते राजकारण आणि आपल्या दैनंदिन कामकाजात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोना संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्या या पत्रावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार निशाणा साधलाय. (BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes sharad pawar)

‘शेतकऱ्यांसाठीही एखादं पत्र पाठवाल अशी अपेक्षा’

‘माननीय पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो’, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

‘मराठा समाज आपल्याकडे आशेने पाहतोय’

‘मा. शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय’, असं ट्वीटही भातखळकर यांनी केलंय.

पवारांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

‘कोरोना जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्यानं पुनश्च संचारबंदीचा निर्णय़ राज्य सरकारला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून, हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत मला अवगत केले. त्यांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे आज राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले’, अशी माहिती पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

संबंधित बातम्या : 

आपण सगळे घाटी होतो, मुंबईतील फेरफटक्यादरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळेंचा संवाद

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू: अजित पवार

BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes sharad pawar