आपल्याला हे बाप-बेट्याचं सरकार घालवायचंय; ठाकरे घराण्यावर नितेश राणेंचं टीकास्त्र

| Updated on: Oct 25, 2020 | 3:43 PM

उद्धव ठाकरे आपण लोकप्रियतेच्याबाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असल्याचा दावा करत होते. | Nitesh Rane

आपल्याला हे बाप-बेट्याचं सरकार घालवायचंय; ठाकरे घराण्यावर नितेश राणेंचं टीकास्त्र
Follow us on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून आई आणि मुलाचे सरकार हटवले. त्याचप्रमाणे आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचे आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेने केवळ मोठमोठी टेंडर मंजूर केली. प्रत्यक्षात मात्र काहीच घडले नाही. उद्धव ठाकरे आपण लोकप्रियतेच्याबाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असल्याचा दावा करत होते. पण कोरोनाच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. अगदी दाऊदची धमकी आली तरी ते घरातच बसून राहिले, अशा शब्दांत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविली. (BJP leaders attack on Uddhav Thackeray and Aaditya Thackeray)

भाजप आमदार सुनील राणे यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी बोरिवली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष मंगलप्रात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार नितेश राणे, आमदार योगेश सागर आणि भाजपचे अन्य नेते उपस्थितीत होते. यावेळी नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नितेश यांनी आदित्य ठाकरे यांना बेबी पेंग्विन संबोधत त्यांची खिल्ली उडविली. तसेच मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावरही टीका केली. कोरोनाच्या काळात पालिकेने केवळ मोठमोठ्या रक्कमेची टेंडर मंजूर करवून घेतली. यानंतर प्रत्यक्षात काहीच घडले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार झाले पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले.

तर आमदार योगेश सागर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप शिवसेनेशी युती करणार नाही, असे सांगितले. पूर्वी आम्हाला शिवसेना अत्यंत ताकदवान पक्ष आहे, असे वाटत होते. परंतु, स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यानंतर आम्हीच शिवसेनेपेक्षा शक्तिशाली आहोत, हे आमच्या लक्षात आल्याचे योगेश सागर यांनी सांगितले.

याशिवाय, बोरीवली मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनीही पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. पालिकेच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले जाणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने आरोग्य क्षेत्रासाठी किती तरतूद केलेय, याची माहिती समोर आली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेने शिक्षण क्षेत्रासाठी साडेतीन हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र, हे पैसे खर्च झालेत नाहीत, असा आरोप आमदार सुनील राणे यांनी केला.

संबंधित बातम्या:

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर, ठाकरे पितापुत्राने राजीनामा द्यावा, निलेश राणेंची मागणी

(BJP leaders attack on Uddhav Thackeray and Aaditya Thackeray)