दिल्लीतून महाराष्ट्रात गनिमी काव्याने रेमडेसिवीर आणले; वाचा, सुजय विखे पाटील कोण आहेत?

| Updated on: Apr 27, 2021 | 4:11 PM

सुजय विखे पाटील हे पेशाने न्यूरोसर्जन आहेत. 2013 पासून ते राजकारणात सक्रिय झाले. | MP Sujay Vikhe Patil

दिल्लीतून महाराष्ट्रात गनिमी काव्याने रेमडेसिवीर आणले; वाचा, सुजय विखे पाटील कोण आहेत?
सुजय विखे
Follow us on

मुंबई: दिल्लीतून नगर जिल्ह्यासाठी गनिमी काव्याने आणलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन सध्या भाजप खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil ) प्रचंड चर्चेत आहेत. याप्रकरणात त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याचीही शक्यता आहे. मात्र, माझी बांधिलकी नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला तर माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. मी कारवाईला घाबरत नाही, असे सांगत सुजय विखे-पाटील यांनी दंड थोपटले होते. (BJP MP Sujay Vikhe Patil political journey)

त्यामुळे आगामी काळात नगर जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण नगरचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांना धूळ चारली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुजय विखे-पाटील यांचे वडील आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नगर जिल्ह्यात कायम महाविकासआघाडी विरुद्ध विखे-पाटील परिवार असे राजकारण रंगताना पाहायला मिळते.

कोण आहेत सुजय विखे-पाटील?

डॉ. सुजय विखे-पाटील हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांचे पुत्र आहेत. सुजय विखे-पाटील यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1982 रोजी झाला. त्यांचा विवाह पूर्वाश्रमीच्या धनश्री कुंजीर यांच्याशी झाला आहे. सुजय विखे पाटील हे पेशाने न्यूरोसर्जन आहेत.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. तसंच विखे-पाटील फाऊंडेशनचे ते प्रमुख आहेत. 2013 पासून डॉ. सुजय विखे-पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे.

सुजय विखे पाटील यांची राजकीय कारकीर्द

युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना सुजय विखे-पाटील यांनी नगर जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणायला सुरुवात केली होती. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या कारभाराचा अनुभव असलेल्या सुजय विखे यांनी सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी गणेश व डॉ. तनपुरे हे बंद पडलेले साखर कारखाने चालवायला घेतले होते. याशिवाय, विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते नगर जिल्ह्यात कायम सक्रिय राहिले.

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सुजय विखे पाटील यांच्याविरोधात संग्राम जगताप यांच्यासारखा तगडा उमेदवार उतरवला होता. संग्राम जगताप दोन वेळा नगरचे महापौर होते. मात्र, सुजय विखे-पाटील यांनी आपल्या नेटवर्किंगच्या बळावर संग्राम जगताप यांचा 1,45,000 मतांनी पराभव केला होता.

(BJP MP Sujay Vikhe Patil political journey)