मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर का गेले नाही? भाजपचा सवाल

| Updated on: Dec 04, 2019 | 4:46 PM

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके दिवस झाले, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीला भेट का दिली नाही, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे (BJP on ChaityaBhumi Program meeting).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर का गेले नाही? भाजपचा सवाल
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके दिवस झाले, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीला भेट का दिली नाही, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे (BJP on ChaityaBhumi Program meeting). माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चैत्यभूमीला भेट दिली. मात्र, उद्धव ठाकरे अद्यापही चैत्यभूमीवर का गेले नाही, असा प्रश्न भाजप नेते भाई गिरकरांनी विचारला आहे (BJP on ChaityaBhumi Program meeting).

भाई गिरकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी आणि संविधान निर्मिती करुन केलेल्या कामासाठी देशातच नाही, तर जगातही सन्मान होतो. त्यामुळे येथे देखील त्यांचा योग्य सन्मान होणं आवश्यक आहे. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु आहे. या तयारीच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी उपस्थित राहायला हवं होतं. संबंधित मंत्र्यांना सांगून देखील ते चैत्यभूमीवर उपस्थित राहिले नाही.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांची अद्यापही मानसिकता बदललेली नाही. ती अजुनही जुन्या काळातीलच आहे. मुंबईत इतका मोठा कार्यक्रम होऊ घातला आहे, तरीही ते येथे आले नाही, असाही आरोप भाई गिरकर यांनी केला.

“माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी चैत्यभूमीला भेट देण्याचा नवा पायंडा पाडला”

भाई गिरकर यांनी महाविकासआघाडीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना चैत्यभूमीवर जाण्याचा नवा पायंडा पाडल्याचा दावा केला. ते म्हणाले, “मागील 5 वर्षात तुम्हाला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरवर्षी ही बैठक घेतली. या कार्यक्रमासाठी कधीकधी ते दोन ते तीन बैठका घेत होते, स्वतः उपस्थित राहात होते. चैत्यभूमीवर लाखो लोक येतात त्यांच्या सोयीसुविधांसाठी ते प्रयत्न करत होते. 6 डिसेंबरला ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करण्यासाठी येत. त्यांनी नवा पायंडा पाडत राज्याच्या राज्यपालांनी देखील येथे यावं असाही प्रयत्न केला. मागील 5 वर्षात तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव देखील येत होते. हे पूर्वी कधी घडलं नव्हतं. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी हे दोघे सकाळी 8 वाजता जात होते.”