कर्नाटक सरकारचे भवितव्य मुंबईच्या हॉटेलमध्ये ठरणार?

| Updated on: Jul 07, 2019 | 2:24 PM

काँग्रेससह भाजपचे अनेक नेते काँग्रेस-जेडीएस आमदारांची मनधारणी करण्यासाठी सोफिटेल हॉटेलमध्ये पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  त्यामुळे कर्नाटक सरकारचे भवितव्य मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

कर्नाटक सरकारचे भवितव्य मुंबईच्या हॉटेलमध्ये ठरणार?
Follow us on

मुंबई : कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 11 आमदारांच्या राजीनाम्यानंतर सत्तापालट होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या 11 आमदारांनी शनिवारी (6 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन राजीनामा दिला होता. त्यानंतर हे सर्व आमदार मुंबईतील  वांद्रे कुर्ला संकुलातील सोफिटेल हॉटेलमध्ये राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह भाजपचे अनेक नेते काँग्रेस-जेडीएस आमदारांची मनधारणी करण्यासाठी सोफिटेल हॉटेलमध्ये पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  त्यामुळे कर्नाटक सरकारचे भवितव्य मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकमध्ये सध्या सत्ताकारणासाठी चांगले नाटक रंगताना दिसत आहे.  नुकंतच  भाजप नेते प्रसाद लाड आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी  राजीनामा दिलेल्या काँग्रेस-जेडीएस आमदारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच उद्या (8 जुलै) राजीनामा दिलेले काही आमदार शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या 11 आमदारांसह आणखी काही आमदार राजनीमा देणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सत्तेत उलथापालट होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

कर्नाटकात भाजपकडून ‘ऑपरेशन कमळ’ वारंवार सुरु करण्यात आलं होतं आणि आता विरोधकांच्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून आमदारांची खेरदी होत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे 10 आमदार मुंबईत दाखल झाल्याने  कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचं सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आलाय.

दरम्यान याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन  यांनी कर्नाटक आमदारांना भेटण्याची जबाबदारी माझ्यासह इतर कोणावरही अद्याप देण्यात आलेली नाही. याबाबतचा संपूर्ण निर्णय केंद्रातून घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.

राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे 8, तर जेडीएसचे 3 आमदार आहेत. याअगोदरही 3 आमदारांनी राजीनामा दिला होता. 11 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन राजीनामे सादर केले. यावेळी अध्यक्ष हजर नसल्याने सचिवांकडे राजीनामे देण्यात आले. विशेष म्हणजे राजीनामे देण्यासाठी गेलेल्या आमदारांनी आपले मोबाईलही बंद केले होते. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना आपल्या आमदारांशी संपर्क साधणं अशक्य झालं आहे.

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत  भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.  इथे सत्ता स्थापनेसाठी 113 जागांची गरज आहे.

आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारी निर्णय होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामे मंजूर केल्यास कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल आणि भाजपसाठी संधी निर्माण होईल. या परिस्थितीमध्ये बहुमतासाठी 106 जागांची आवश्यकता असेल. भाजपला केवळ एका आमदाराची गरज असेल, जी अपक्षांकडून केली जाऊ शकते.

कर्नाटकातील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता आहे. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपला आणखी किमान दहा आमदारांची आवश्यकता आहे. आपल्याला 120 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचं कुमारस्वामींनी यापूर्वी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :

कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे, जेडीएस-काँग्रेस सरकार धोक्यात

कर्नाटकात उलथापालथ निश्चित, काँग्रेस-जेडीएसचे 10 आमदार राजीनामा देऊन मुंबईत