मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपचं उपोषण

| Updated on: Jan 24, 2020 | 9:10 PM

मराठवाड्याच्या दुष्काळ आणि पाणी प्रश्नासाठी भाजप औरंगाबादेत लाक्षणिक उपोषण करणार आहे.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपचं उपोषण
Follow us on

उस्मानाबाद : मराठवाड्याच्या दुष्काळ आणि पाणी प्रश्नासाठी भाजप औरंगाबादेत लाक्षणिक उपोषण करणार आहे (BJP Hunger Strike). कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 27 जानेवारीला हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी सकाळी दहा वाजता हे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली (Marathwada Water Issue).

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कोअर कमिटीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. या उपोषणात देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या. मात्र, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारमधील नेत्यांचा बहुतेक वेळ एकमेकांवर कुरघोडी करण्यातच जात आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे या सरकारचे दुर्लक्ष होत आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली होती. पण, आता मात्र या विभागाच्या विकासाचे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण होणार आहे.

भाजपच्या मागण्या काय?

  • मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे
  • मराठवाडा विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावे
  • जलयुक्त शिवार योजना पुढे चालू ठेवावी आणि प्रभावीपणे राबवावी
  • महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजना तातडीने सुरु करुन अकरा धरणे लूप पद्धतीने जोडावीत
  • मराठवाड्याची पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून त्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी
  • जायकवाडी धरणात पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करुन कालव्याद्वारे सिंधफणा आणि वाण उपखोऱ्यांमध्ये सोडावे
  • कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा
  • मराठवाड्याचा सिंचन अनुशेष आणि पाण्याची तूट भरुन काढावी
  • या विभागाला देय असलेले अनुशेष अनुदान तातडीने द्यावे
  • फडणवीस सरकारने मंजूर केलेली औरंगाबाद शहराची 1680 कोटींची नवीन पाणी पुरवठा योजना तातडीने सुरु करावी आणि बीड जिल्ह्याचा आरक्षित पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा