संजय राऊत हा जोशी कधीपासून झाला? ‘या’ खासदाराचा सवाल

| Updated on: Nov 29, 2022 | 8:14 AM

शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत हेच जबाबदार आहेत, असा घणाघातही या खासदाराने केला.

संजय राऊत हा जोशी कधीपासून झाला? या खासदाराचा सवाल
Image Credit source: social media
Follow us on

गणेश सोळंकी, बुलढाणाः संजय राऊत (Sanjay Raut) हे वारंवार सरकार (Maharashtra Govt) पडेल अशी वक्तव्ये करत असतात. पण हे भविष्य सांगायला तो जोशी कधीपासून झाला, असा सवाल बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी विचारला आहे. संजय राऊत हे अशी वक्तव्य करून केवळ जनतेची करमणूक करत आहेत, अशी टीका जाधव यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर खोक्यांचा आरोप पुन्हा एकदा गेला. त्यावर खासदार जाधव म्हणाले, हे पहिल्यांदाच नाही बोलले. रोज सकाळी उठले की खोके आणि बोके हाच विषय त्यांच्याकडे उरला आहे. अतिशय नैराश्यामुळे ते असे बोलतात. त्यांच्या आरोपात तथ्य नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं.

शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत हेच जबाबदार आहेत, असा घणाघात त्यांनी केला. प्रतापराव जाधव म्हणाले, ‘ संजय राऊत यांनी छातीवर हात ठेऊन सांगावे, की खरंच तो शरद पवार यांचा निष्ठावान आहे ,की उद्धव ठाकरे यांचा .. शरद पवारांकडून सुपारी घेऊनच शिवसेना संपवण्याचं काम संजय राऊत यांनी केलं आहे. राहिलेली शिवसेना संपवून शरद पवार यांची शाबासकी मिळवणार आहे…

उद्धव ठाकरेंना आव्हान

खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. हिंमत असेल तर त्यांनी माझ्याविरोधात बुलढाण्यातून निवडणूक लढवावी. आम्ही तर शिवसेनेवर लढणार, भाजपा हा मित्रपक्ष असून पुढील निवडणूक आम्ही सोबतच लढणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मशालीने गद्दारांचे घर जाळल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर खासदार जाधव म्हणाले, ‘ तुमचे घर अगोदर  सांभाळा.. मग दुसऱ्याचे घर जळायचा विषय तुम्ही करा.. ज्यांचे घर काचाचे त्यांनी दुसऱ्याच्या घराला दगड मारायची नसतात.. यांचे पूर्ण घर पांगलेले आहे.. दररोज अनेक लोक आमच्यात सहभागी होतात . नैराश्य पोटी असल्याने केलेले हे विधान आहे ..