मराठा आरक्षणाची रणनीती ठरली होती, लढा चालू ठेवू हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली – कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत

| Updated on: Aug 14, 2022 | 1:41 PM

प्रत्येकावर हा मृत्यूचा घाला होणार आहे मात्र मेटे यांचे असे काही होईल हे अपेक्षित नाही, कधीही न भरून येणारी हानी आहे असे सांगत मंत्री सावंत यांनी श्रद्धांजली अर्पण केली. उस्मानाबाद व बीड जिल्हा जवळ जवळ असल्याने मंत्री सावंत आणि मेटे यांचे संबंध चांगले होते.

मराठा आरक्षणाची रणनीती ठरली होती, लढा चालू ठेवू हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली - कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत
Follow us on

उस्मानाबाद : विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनाने मराठा समाजाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. मराठा समाजासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मराठा आरक्षणाचा लढा चालूच ठेवू हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली अश्या शब्दात मंत्री डॉ तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी विनायक मेटे यांना बार्शी येथे शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी आमदार राजाभाऊ राऊतसह पदाधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाच्या बैठकीसाठी मुंबई येथे जात असताना मेटे यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाला व त्यात त्यांचे निधन झाले. मराठा समाजाला धक्का आहे, एक मोठे नेतृत्व समाज भूषण एक हिरा गमावला आहे, दिवा आज आपल्यातून मालवला आहे. मेटे यांनी मराठा समाज सोडून त्यांनी आयुष्यभर काम केले नाही, सत्ता कोणाची असली तरी त्यांनी दबावाखाली न दबता समाजाच्या मागणीसाठी लढा दिला.

नियोजन व पुढील दिशा ठरली होती

चार दिवसापूर्वी माझी त्यांची भेट झाली होती. आम्ही एकत्र बसून मराठा आरक्षण लढा कसा दयचा, सुप्रीम कोर्टात नेमकी भूमिका काय घ्यायची याचे सगळे नियोजन व पुढील दिशा ठरली होती. अधिवेशननंतर आरक्षण लढ्याचा पुढील टप्पा कसा करायचा हे ठरले होते. चार दिवसापूर्वी भेटलेला माणूस आपल्यात नाही हे बुद्धीला न पटणारे व धक्कादायक आहे, हे सहन न होणारे आहे. मराठा समाजाला व मेटे कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

हे सुद्धा वाचा

कधीही न भरून येणारी हानी आहे

प्रत्येकावर हा मृत्यूचा घाला होणार आहे. मात्र मेटे यांचे असे काही होईल हे अपेक्षित नाही, कधीही न भरून येणारी हानी आहे असे सांगत मंत्री सावंत यांनी श्रद्धांजली अर्पण केली. उस्मानाबाद व बीड जिल्हा जवळ जवळ असल्याने मंत्री सावंत आणि मेटे यांचे संबंध चांगले होते शिवाय या दोघांनी मराठा आरक्षण, मराठा क्रांती मुक मोर्चासह अनेक आंदोलनात एकत्र काम केले होते

दौरा रद्द, सत्कार स्वीकारणार नाहीत

कॅबिनेट मंत्री झाल्यावर प्रा डॉ तानाजीराव सावंत हे पहिल्यांदा उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यामुळे जिल्ह्यात भव्य स्वागत व सत्कार समारंभ ठेवले होते मात्र मेटे यांचे निधन झाल्याने त्यांनी परंडा, भूम, वाशी कळंब व उस्मानाबाद तालुका दौरा रद्द केला आहे. सावंत आज कुठेही हारे-तुरे सत्कार स्वीकारणार नाहीत.