दिल्लीच्या निकालांवर शरद पवारांनी शेखी मिरवू नये, चंद्रकांत पाटील बरसले

| Updated on: Feb 13, 2020 | 3:53 PM

शरद पवार आणि शिवसेनेने भाजपला खिजवण्याचं काम करु नये, असं चंद्रकांत पाटलांनी सुनावलं. 

दिल्लीच्या निकालांवर शरद पवारांनी शेखी मिरवू नये, चंद्रकांत पाटील बरसले
Follow us on

पुणे : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेखी मिरवू नये, ‘आम आदमी पक्षा’ला मिळालेल्या यशात त्यांचं काहीही योगदान नाही, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil on Sharad Pawar) केली आहे.

दिल्लीच्या निकालाचा टेंभा शिवसेनेनेही मिरवू नये. काँग्रेसने शरणागती पत्करली, त्यामुळे ‘आप’चा विजय झाला. शरद पवार आणि शिवसेनेने भाजपला खिजवण्याचं काम करु नये, असं चंद्रकांत पाटलांनी सुनावलं.

‘भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा माझी निवड झाली, याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. नजीकच्या काळात घटनात्मक रचना पुन्हा नीट करण्याचं मोठं आव्हान आहे. अचानक गेलेल्या सरकारमुळे जी मरगळ आली, ती झटकून कार्यकर्ते पुन्हा एकदा कसे जोमाने कामाला लागतील, हे पाहणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी ‘टी’ सांगितलं.

सरकार नाहीये, त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सक्षम भूमिका कशी बजावावी, यासाठी प्रयत्न करायचा आहे, असंही पाटलांनी सांगितलं. ठाकरे सरकारने आधीच्या सरकारची प्रत्येक गोष्ट करण्याचा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द करताय तर पर्याय द्या, असं आव्हानही चंद्रकांत पाटलांनी दिलं.

या सरकारमध्ये विसंवाद आहे. बोलणं खूप चाललं आहे, असा घणाघात त्यांनी केला. आम्हीसुद्धा नम्र असायला हवं. अहंकार असेल तर तो कमी करायला हवा, असं सांगायलाही पाटील विसरले नाहीत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना दिलेली तंबी जर प्रेसला कळत असेल, तर मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल राहिलेला नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

हेही वाचा : चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्षपदी कायम, मुंबई अध्यक्षांचीही फेरनिवड!

मुंबई पोलिस आयुक्तांच्या कुटुंबियांना काम देण्याचा निर्णय फडणवीस घेणार नाहीत. त्यामुळे चौकशी लावा, दोषी असेल तर कारवाई करा. रोज उठून वेगवेगळे आरोप करण्यापेक्षा दोन दिवस घ्या आणि काय असेल ते बाहेर काढा, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

घटनेने केंद्राला अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे एल्गार प्रकरणात एनआयएला तपास द्यावा लागेल, असं मतही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझर लावून काँग्रेस पाडत असेल, आणि तरीही शिवसेना गप्प बसत असेल, तर शिवसेनेला सत्ता लखलाभ असो, असंही पाटील म्हणाले.

Chandrakant Patil on Sharad Pawar