राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, महागात पडेल : चंद्रकांत पाटील

| Updated on: Nov 07, 2020 | 3:49 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली (Chandrakant Patil Slams Maharashtra Government on Maratha Reservation).

राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, महागात पडेल : चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : “राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करुन मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे”, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर केला आहे (Chandrakant Patil Slams Maharashtra Government on Maratha Reservation).

“राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याशिवाय मराठा आरक्षण EWS अंतर्गत देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र, त्यांनी मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी SEBC प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब आहे”

“अकरावी, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत. मराठा तरुणांचं भवितव्य अंधारमय होत चाललं आहे. मात्र बिनकामी राज्य सरकारला याची किंचितसुद्धा पर्वा नाही. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही, हे सिद्ध होतंय”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

“राज्य सरकारने आतातरी सत्तेचा माज सोडून मराठा तरुणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिलं आहे”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला (Chandrakant Patil Slams Maharashtra Government on Maratha Reservation).

मराठा क्रांती मोर्चाचा मशाल मार्च आज मातोश्रीवर धडकणार

दरम्यान, आरक्षणासाठी मराठा समाजदेखील आक्रमक झाला आहे. राज्यातील विविध भागात आरक्षणासाठी आंदोलने केली जात आहेत. मुंबईत मराठा क्रांची मोर्चाने आज (11 नोव्हेंबर) मशाल मोर्चाचे आयोजित केला आहे. हा मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवास्थाबाहेर धडकणार आहे.

मराठा आरक्षण लागू व्हावं, सुप्रीम कोर्टात ते टिकावं, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज मशाल मार्चचं आयोजन केलं आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून, शांततेत झाला आहे. त्याप्रमाणेच आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल. मोर्चेकरी हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमणार आहेत. मोर्चासाठी पूर्व तयारी म्हणून बैरिकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.