चंद्रकांत पाटलांचं आवाहन उद्धव ठाकरे स्वीकारतील? फडणवीसांना घेऊन मोदींना भेटतील?

| Updated on: Dec 21, 2020 | 1:51 PM

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना एक सल्ला देऊ केलाय. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्या, असं पाटील यांनी सांगितलं आहे. 

चंद्रकांत पाटलांचं आवाहन उद्धव ठाकरे स्वीकारतील? फडणवीसांना घेऊन मोदींना भेटतील?
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: कांजूर मार्गच्या जमिनीवरील मेट्रो कारशेडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना एक सल्ला दिला आहे.(Chandrakant Patil’s advice to CM Uddhav Thackeray)

“टीम इंडिया असं समजून काम करा उद्धवजी… आताही वेळ आहे!” असं ट्वीट करुन चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना एक सल्ला देऊ केलाय. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्या, असं पाटील यांनी सांगितलं आहे.

“आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचं भारतीय जनता पार्टी स्वागत करते. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे 80 टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. तुम्ही सुरुवातीपासूनच याला इगोचा विषय बनवला. जर तुम्हाला केंद्राची जागा हवी होती. तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते. तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजी यांना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ शकला असता. पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे. ते जनतेला भ्रमात पाडणारे आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही देवेंद्रजी यांना सोबत घेऊन मोदीजी यांची आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेत घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे,” असं ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

फडणवीसांचाही मुख्यमंत्र्यांना सल्ला

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. “प्रश्न श्रेयाचा नाहीच. तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधांचा आहे. श्रेयासाठी काम करणं हा भाजपचा स्वभाव नाही. त्यामुळे हा प्रश्न अपश्रेयाचा करू नये आणि हे अपश्रेय तुमच्या वाटेला येऊ नये हीच सदिच्छा,” असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. यावेळी कारशेडसाठी भविष्यात अतिरिक्त जागा लागणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा मुद्दाही फडणवीस यांनी खोडून काढला. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नाही. मग ही दिशाभूल कशासाठी? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

हवं तर कांजूर कारशेडचं श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन

होय, मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

Chandrakant Patil’s advice to CM Uddhav Thackeray