उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पूर्ण करणार, बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भुजबळांच्या भावना

| Updated on: Nov 17, 2019 | 12:03 PM

'बाळासाहेबांची रोज, एकदा तरी... कमीत कमी एकदा तरी आठवण येत असते, असं छगन भुजबळ म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पूर्ण करणार, बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भुजबळांच्या भावना
Follow us on

मुंबई : राज्यात महासेनाआघाडी सरकार स्थापन होण्याच्या वाटेवर असतानाच शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, असं भुजबळ (Chhagan Bhujbal at Balasaheb Thackeray Memorial) यावेळी म्हणाले.

शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनी राज्यभरातील शिवसैनिक शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहत आहेत. अनेक राजकीय नेतेही बाळासाहेबांना शिवतीर्थावर आदरांजली वाहण्यासाठी येत आहेत.

बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह छगन भुजबळ शिवतीर्थावर आले होते. ‘बाळासाहेबांची रोज, एकदा तरी… कमीत कमी एकदा तरी आठवण येत असते. बाळासाहेबांबरोबर 25 वर्ष मी शिवसेनेमध्ये कार्यरत होतो. शिवसेनेत त्यावेळी जे चढउतार होते, शिवसेनेच्या ज्या लढाया होत्या, त्यामध्ये प्रत्यक्षरित्या मी सहभागी होत होतो. त्या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. आणि बाळासाहेब दिवसातून एकदा तरी निदान त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही’ अशा भावना छगन भुजबळ यांनी साश्रू नयनांनी व्यक्त केल्या.

शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या ‘मनातील मुख्यमंत्री’ कोण?

राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एकत्रित महासेनाआघाडी सत्तास्थापना करण्याच्या तयारीत आहे. त्याविषयी प्रश्न विचारला असता, ‘अपेक्षा करुया लवकरात लवकर ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पार पडतील’ असा आशावाद भुजबळांनी व्यक्त केला. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, असं विचारल्यावर ‘आपण सगळे मिळून तो शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया’ असंही भुजबळ (Chhagan Bhujbal at Balasaheb Thackeray Memorial) म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं.

राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांनी शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्यास काही हरकत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तर शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत कोणती मागणी असेल, तर त्यावर विचार करु, असं म्हटलं होतं. पाच वर्ष सेनेला मुख्यमंत्रिपद, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री यावर सहमती झाल्याची माहिती आहे. तर 14-14-12 मंत्रिपदं अशा अनुक्रमे सेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाटाघाटी यशस्वी झाल्याचं म्हटलं जातं.