‘दाऊदसारख्या कित्येकांना मी अंगावर घेतलंय, सुरक्षा काढणाऱ्यांनी हे ध्यानात घ्यावं’, भुजबळांचा इशारा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मविआच्या नेत्यांची सुरक्षा काढल्याच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलंय...

दाऊदसारख्या कित्येकांना मी अंगावर घेतलंय,  सुरक्षा काढणाऱ्यांनी हे ध्यानात घ्यावं, भुजबळांचा इशारा
| Updated on: Oct 29, 2022 | 2:41 PM

नाशिक : शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सत्तेत आल्यानंतर बरेच बदल झाले. नुकतंच राज्य सरकारच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा कमी केलीय तर काही नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपलं मत मांडलंय. तसंच त्यांनी शिंदे सरकारला इशाराही दिलाय.

भुजबळ यांचा इशारा

सुरक्षा काढली या बाबत काही ही बोलणार नाही आरोप करणार नाही. मी गृहमंत्री असताना माझ्यावर हल्ला झाला होता. मला अनेक अडचणी आल्या. दाऊदसारख्या कित्येकांना मी अंगावर घेतलंय. ज्यांची ज्यांची सुरक्षा काढली त्याबाबत सरकारने पुनर्विचार करावा, असं भुजबळ म्हणालेत.

या नेत्यांची सुरक्षा काढली

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत, बंटी उर्फ सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनील केदारे आणि डेलकर परिवार यांची सुरक्षा काढली आहे. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची एक्स दर्जाची सुरक्षा काढण्यात आली आहे.

भाजप आमदारांनी टाटा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाविकास आघाडीवर आरोप केला. पण असे प्रकल्प परराज्यात जाणं जातात हे दुर्दैवी असल्याचं भुजबळ म्हणालेत.

टाटा-एअर बसचा प्रकल्प गुजरातला गेला. हा प्रकल्प नागपूरच्या मिहान इथं होणार होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता तर 22 हजार कोटींची आर्थिक गुंतवणू राज्यात झाली असती. तरूणांना रोजगार मिळाला असता. पण हा प्रकल्प सध्या गुजरातला गेला आहे.