‘जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्यात राणेंचं योगदान, दुसरा कुणी इथं येऊच शकत नाही’, उद्धव ठाकरेंसमोर राणेंचा हल्लाबोल

| Updated on: Oct 09, 2021 | 2:15 PM

तब्बल 16 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही. इतकंच नाही तर नारायण राणे यांनी व्यासपीठावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.

जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्यात राणेंचं योगदान, दुसरा कुणी इथं येऊच शकत नाही, उद्धव ठाकरेंसमोर राणेंचा हल्लाबोल
नारायण राणे, उद्धव ठाकरेंच्या हस्ते दीप प्रज्वलन
Follow us on

सिंधुदुर्ग : गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य पाहायला मिळालं. तब्बल 16 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही. इतकंच नाही तर नारायण राणे यांनी व्यासपीठावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. (Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena leaders at Sindhudurga)

नारायण राणे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत केली. मात्र, पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. व्यासपीठावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री भेटले.. काहीतर कानाजवळ बोलले. मला एक शब्द ऐकू आला… असो… पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजकांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. ते म्हणाले तुझी तिकडे गरज आहे. 90 साली जिल्हा फिरलो. फेब्रुवारी महिन्यातही जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं. जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते. अनेक गावांना वीज नव्हती. 90 सालापर्यंत अंधारात लोक राहायचे. इथली मुलं कितीही शिकली तरी नोकरीसाठी मुंबईला जायची. मुंबईवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात मी आलो. तेव्हा मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा, असं राणे आपल्या भाषणात म्हणाले.

‘उद्धवजी हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं’

उद्धवजी हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं. त्यात माझा स्वार्थ नव्हता. मी छोटा-मोठा उद्योजकही आहे. सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल याचा विचार मी केला. तेव्हा विमानतळाचा मुद्दा समोर आला. तेव्हा मी टाटाकडे गेलो. बाजूला गोवा आहे, तुम्हाला समुद्र लाभलाय. पर्यटनाच्या दृष्टीने पोषक जिल्हा आहे. 95 ला युतीची सत्ता आली. मनोहर जोशींना मी सांगितलं की पर्यटन जिल्हा करु. तेव्हा केंद्राकडे परवानगी मागितली आणि देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग झाला.

‘जे दिसतंय त्याच्या उभारणीला राणेंचं योगदान’

साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही.

‘विकासकामं कोण अडवतं विचारा जरा’

सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना क्रेडीट टीमला द्यायचा. तसं माझं आहे. उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला एक विनंती आहे. याच जागेवर मी व प्रभू साहेब भूमिपूजनासाठी आलो. त्यावेळी काही लोक समोर आंदोलन करत होते. विमानतळ नको म्हणत होते. मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आमचं भागवा आणि रस्ता सुरु करा, अशी मागणी करायचे. रस्ता कोण अडवतं विचारा जरा, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेना नेत्यांवर टीकास्त्र डागलं.

‘काम अडवणारे आज स्टेजवर आहेत’

कोण काम अडवत होतं, कोण आंदोलन करत होतं… आहेत स्टेजवर. तुम्ही समजता तसं नाही. तुम्ही आलात मला बरं वाटलं, आनंद वाटला. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी टाटांच्या अहवालाचा अभ्यास करावा. विकासासाठी पैसा द्यावा. धरणाला एक रुपया दिला जात नाही. धरणाचं काम अजून पूर्ण नाही. कसला विकास… विमानतळावर लोकांनी आल्यावर काय पाहावं.

विमानतळ काय देसाई कंपनीचं आहे काय?

मला आज कळलं विमानतळाचे मालक कोण? म्हसकर गेले आणि दुसरे आले. विनायक राऊतांनी स्टेजवरुन सांगितलं. विमानतळ काय देसाई कंपनीचं आहे काय? बाळासाहेबांना खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. खोटं बोलणाऱ्यांना साहेबांकडे थारा नव्हता. तुम्हाला मिळणारी माहिती खरी नाही, असं आवाहनही राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलंय.

इतर बातम्या :

सुभाष देसाईंनी नारायण राणेंचं नाव टाळलं!, तर देशातील नंबर एक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख

Sindhudurg chipi airport | तब्बल 16 वर्षांनी एकाच मंचावर, शेजारी-शेजारी खुर्ची, तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही

Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena leaders at Sindhudurga