Maharashtra politics : अंगावरच्या कपड्यानीशी गेलो अन् हॉटेलबाहेर कपड्यांनी भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या; शिरसाट यांनी सांगितला सुरतमधील ‘तो’ किस्सा

| Updated on: Jul 08, 2022 | 8:44 AM

गेले काही दिवस राज्याने सत्तानाट्य अनुभवले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन, नवे सरकार स्थापन होताच त्यावर आता पडदा पडला आहे. मात्र या सर्व प्रवासात काय काय घडलं याचे एक-एक किस्से आता समोर येत आहेत.

Maharashtra politics : अंगावरच्या कपड्यानीशी गेलो अन् हॉटेलबाहेर कपड्यांनी भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या; शिरसाट यांनी सांगितला सुरतमधील तो किस्सा
Image Credit source: facebook
Follow us on

मुंबई : गेले काही दिवस राज्याने सत्तानाट्य अनुभवले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा देऊन, नवे सरकार स्थापन होताच त्यावर आता पडदा पडला आहे. मात्र या सर्व प्रवासात काय काय घडलं याचे एक-एक किस्से आता समोर येत आहेत. खुद्द बंडखोर आमदारच याबाबत खुलासा करत आहेत. आता असाच एक किस्सा बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितला आहे. आम्ही ज्या दिवशी मुंबईहून (Mumbai) सुरतला निघालो त्यावेळी आम्हाला नेमकं कुठे जायचे हे माहीत नव्हते. आमचे नेते एकनाथ शिंदे हे चला म्हटले म्हणून आम्ही निघालो. आम्ही आमच्यासोबत पुरेसे सामान देखील घेतले नव्हते. त्यानंतर आम्ही मध्यरात्री दोन वाजता सुरतमधील एका हॉटेलमध्ये पोहोचलो. आम्ही अंगावरच्या कपड्यानीशी सुरतला आल्याने आम्हाला घालायला कपडे देखील नव्हते. जेव्हा आम्ही ही अडचण एकनाथ शिंदे यांना सांगितली तेव्हा दुसऱ्याच दिवशी आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहात होतो त्या हॉटेलमध्ये कपड्यांनी भरलेली वाहने दाखल झाली. बघता बघता हॉटेलमधील आमच्या रूमला दुकानाचे स्वरूप प्राप्त झाले. आम्ही त्यातून आम्हाला जे ड्रेस आवडले ते घेतल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले.

आमदारांची विशेष व्यवस्था

बंडखोर आमदार 21 जून रोजी सूरतमध्ये पोहोचले होते. मात्र ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत अंगावरच्या कपड्यानीशी बाहेर पडल्याने सुरतला पोहोचल्यावर आता पुढे काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. ही समस्या कशा पद्धतीने सोडवण्यात आली हे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडले, सुरुवातीला त्यांच्याकडे 13 आमदार होते. या आमदारांसह शिंदे हे सुरतला पोहोचले. सुरतला एका मोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. तसेच हॉटेलभोवती गुजरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली. या आमदारांना सुरतहून नंतर गुवाहाटीला हलवण्यात आले. या प्रवासादरम्यान आमदारांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

संजय शिरसाट पुन्हा चर्चेत

संजय शिरसाट हा किस्सा सांगितल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वी देखील त्यांनी शिवसैनिकांच्या भावना उद्धव ठाकरे यांना कळवण्यासाठी एक पत्र लिहिले होते. या पत्राची देखील मोठी चर्चा झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पत्र ट्विट देखील केले होते. मात्र त्यानंतर लगेचच शिरसाट यांच्याच मतदारसंघातील एका शिवसैनिकांनी शिरसाट यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांच्या पत्राला प्रत्युत्तर देण्यात आले होते. या पत्राची देखील बरीच चर्चा झाली होती.