या जागांचा तिढा कायम, मुख्यमंत्री उद्या चर्चेला ‘मातोश्री’वर जाणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी काही जागांवरुन दोन्ही पक्षांची डोकेदुखी मात्र कायम आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा चर्चेसाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर जाणार आहेत. या भेटीमध्ये राज्यातील विविध जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे जालन्यातील जागेवरुन संघर्ष सुरु आहे. शिवसेना मंत्री अर्जुन […]

या जागांचा तिढा कायम, मुख्यमंत्री उद्या चर्चेला मातोश्रीवर जाणार
Follow us on

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी काही जागांवरुन दोन्ही पक्षांची डोकेदुखी मात्र कायम आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा चर्चेसाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर जाणार आहेत. या भेटीमध्ये राज्यातील विविध जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

एकीकडे जालन्यातील जागेवरुन संघर्ष सुरु आहे. शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर या जागेसाठी इच्छुक आहेत. पण ही जागा भाजपची आहे. त्यामुळे या जागेवरही चर्चा होणार आहे. उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झाल्याचं खोतकरांनी सांगितलं. भेटीबाबत ते म्हणाले, “काही तक्रारी केल्या, माझ्यावरती काय अन्याय झाला, प्रसंग झाला याबाबत उद्धव ठाकरे यांना सांगितलं. मी पुढे गेलोय. मतदारसंघ हा शिवसेनेकडे आला पाहिजे ही मागणी केली आहे. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर भेटतील. पक्षावर कोणतीही नाराजी नाही. मी बाजारात चांगला माल आहे. उद्धव ठाकरे उद्या सांगतील ते मी मान्य करेन. मुख्यमंत्र्यांबाबत आदर आहे, त्यांनी कायम साथ दिली. माझी भूमिका उद्धव ठाकरेच ठरवतील, असं खोतकर म्हणाले.

भिवंडीत काय होणार?

भिवंडीची जागाही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. भिवंडीची जागा शिवसेनेला हवी असल्याचीही चर्चा आहे. सध्या या ठिकाणी कपिल पाटील हे भाजपाचे खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर चर्चा होऊ शकते. याअगोदर भाजपने पालघरची जागा शिवसेनेसाठी सोडली होती. युती करण्याअगोदरच ही अट भाजपने मान्य केल्याची माहिती आहे.

रामदास आठवलेंची नाराजी दूर होणार?

रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले हे युती झाल्यापासून नाराज आहेत. त्यांनी जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवली आहे. ते ईशान्य मुंबईतून लढण्यास उत्सुक आहेत. या मतदारसंघात सध्या भाजपचे किरीट सोमय्या हे खासदार आहेत. शिवसेना आणि सोमय्या यांचं फार बरं नाही. त्यामुळे या जागेवर काही चर्चा होऊ शकते.

शिवसेनेकडे असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपला हवा असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत या मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र हा मतदारसंघ भाजपाला त्यांच्या उमेदवारासाठी हवा आहे. आता हा मतदारसंघ शिवसेना भाजपाला देणार का? यावरही गुरुवारी चर्चा होऊ शकते.

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खोतकर काय म्हणाले? पाहा