शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का? मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला

| Updated on: Aug 02, 2019 | 10:26 AM

मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना पक्ष आणि शरद पवारांना न सोडण्याच्या दिलेल्या शपथेवरुन टीकास्त्र सोडलं.

शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का? मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला
Follow us on

वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं. “काही पक्षांची अवस्था अशी झाली आहे की त्या पक्षात कुणी राहायला तयार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना शपथ दिली जात आहे, पण ते तरी राहतील का हा प्रश्न आहे”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. त्याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना पक्ष आणि शरद पवारांना न सोडण्याच्या दिलेल्या शपथेवरुन टीकास्त्र सोडलं.

आमच्याकडे लिमिटेड जागा

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भाजपमध्ये अनेक लोक येत आहेत, मात्र आम्ही सर्वांनाच घेऊ शकत नाही, काहींना घेऊ. आमच्याकडे लिमिटेड जागा आहेत. काही जण येऊ शकतात पण फार नाही”

EVM ला दोष का?

विरोधी पक्षांनी आज ईव्हीएमविरोधात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन केलं तर उत्तर मिळेल. EVM काही आता आलेलं नाही. ईव्हीएमच्या जोरावर विरोधकांनी सर्वत्र राज्य केलं आहे, मग आताच आंदोलन आणि आक्षेप का?”

महाजनादेश यात्रेतून नागरिकांशी संवाद

महाजनादेश यात्रा ही सरकारची नाही तर भाजपची आहे. या यात्रेतून जनतेशी संवाद साधत आहे. केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे युतीला अभूतपूर्व यश मिळेल. विदर्भातून यात्रा सुरु केलीय. जो बॅकलॉग होता तो भरून काढलाय. ते मी जनतेला सांगतोय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य दुष्काळमुक्त करणार

महाजनादेश यात्रेला जनतेचे प्रचंड समर्थन मिळत आहे. पाच वर्षात केलेल्या कामांची ही पावती आहे. गेल्या पाच वर्षात प्रचंड कामे केली. पुढच्या पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे लक्ष्य आहे. पुढील 5 वर्षात राज्य दुष्काळमुक्त करणार, तेलंगणाला वाहून जाणारं 100 TMC पाणी वापरता येईल, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फायदा होणार, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.