बाळासाहेब ठाकरे की वाजपेयी, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, समृद्धी महामार्गाचं नाव अखेर ठरलं!

| Updated on: Dec 11, 2019 | 3:53 PM

समृद्धी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती.

बाळासाहेब ठाकरे की वाजपेयी, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, समृद्धी महामार्गाचं नाव अखेर ठरलं!
Follow us on

मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला (Balasaheb Thackeray samruddhi mahamarg) अखेर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समृद्धी महामार्गाला (Balasaheb Thackeray samruddhi mahamarg) बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफीचाही निर्णय घेण्यात आला.

समृद्धी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काही आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. तेव्हाच महामार्गाच्या नामांतरावरुन युतीत वाद होण्याची चिन्हं निर्माण झाली होती.

देशातील पहिल्या वहिल्या मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही बाळासाहेब ठाकरेंनी रोवली होती. त्यांच्या योगदानाचा आणि दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. मात्र वाजपेयींचं नाव देण्याची घोषणा झाल्यामुळे आता दबावाचं राजकारण नको, अशी तंबी फडणवीसांनी दिल्याचं म्हटलं गेलं.

जवळपास 56 हजार कोटी रुपये खर्चून मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील 710 किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमधील 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे.