मराठा आंदोलन आणि शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा सुरु, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

| Updated on: Dec 04, 2019 | 10:51 PM

आरे, नाणार आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांनंतर आता मराठा आंदोलन आणि शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत (Uddhav Thackeray on Maratha Morcha and Farmer Strike cases).

मराठा आंदोलन आणि शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा सुरु, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Follow us on

मुंबई : आरे, नाणार आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांनंतर आता मराठा आंदोलन आणि शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत (Uddhav Thackeray on Maratha Morcha and Farmer Strike cases). कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे या निर्णयाची माहिती दिली. ते कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोणत्याही निरपराध व्यक्तिविरोधात कारवाई होणार नाही, असं आश्वासनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलं (Uddhav Thackeray on Maratha Morcha and Farmer Strike cases).

एकनाथ शिंदे म्हणाले, “मागील 5 वर्षात झालेल्या नाणार आंदोलन, शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन अशा सर्वच आंदोलनांमधील गुन्ह्यांचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. या बैठकीत आधी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची आणि त्यातील अडथळ्यांची माहिती घेण्यात आली. मी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत निर्देशही दिले आहेत. निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही.”

मराठा आंदोलनातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होईल. त्यानंतर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय होईल, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

“आकसाने कोणतीही कारवाई होणार नाही”

एकनाथ शिंदे यांनी आकसाने कोणतीही कारवाई होणार नाही, असंही आश्वासन दिलं आहे. ते म्हणाले, “बैठकीत विकास प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्याला गती देण्याबाबत चर्चा झाली. नवे मुख्यमंत्री आल्यानंतर प्रकल्पांची माहिती घेणे स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या सद्यस्थितीचीही माहिती घेतली आहे. आकसाने कोणतीही कारवाई होणार नाही. राज्याच्या हितासाठी जे करावं लागेल ते करण्याची चर्चा कॅबिनेटमध्ये झाली.”

अवकाळी पावसाने झालेले नुकसान, कर्जमुक्ती असेल यावरही चर्चा झाली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी जे करणं शक्य आहे ते केलं जाईल, असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं.