मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही, पण फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, आतापर्यंतची मेहनत वाया जाईल: मुख्यमंत्री

| Updated on: Nov 08, 2020 | 3:17 PM

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. | CM Uddhav Thackeray

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही, पण फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, आतापर्यंतची मेहनत वाया जाईल: मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई: दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याऐवजी नागरिकांनी स्वत:वरच काही बंधने घालून घ्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले. पूर्वीच्या काळात फटाके वाजवण्यात गंमत होती. मात्र, अलीकडच्या काळात लोकसंख्या आणि प्रदूषण वाढले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होऊन कोरोनाचा धोका वाढत असेल तर आपण फटाक्यांवर बंदीऐवजी स्वत:वर काही बंधने घालून घेऊ शकत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना विचारला. (CM Uddhav Thackeray urges people to take care in Diwali)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचे का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नागरिकांनी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घराच्या आजुबाजूला फटाके जरुर वाजवावेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवू नयेत, असे उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले.

राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल. मात्र, त्याबाबत घाई करून चालणार नाही. सर्वप्रथम आपल्याला मंदिरे सुरु करण्यासंदर्भातील नियमावली तयार झाली पाहिजे. अन्यथा मंदिरात तासनसात नामस्मरणात तल्लीन राहणाऱ्या आपल्या घरातील ज्येष्ठांना धोका निर्माण होऊ शकतो. मंदिरे उघडत नाही म्हणून अनेकजण माझ्यावर टीका करत आहेत. मात्र, मला तुम्हा सगळ्यांची काळजी असल्यामुळे मंदिरे उघडण्याचा निर्णय योग्यवेळीच घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

‘महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी राज्याची बदनामी केली, तरीही आपल्या राज्यात नवे उद्योग आले’
कोरोनाच्या काळात महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी राज्याची बदनामी करण्याचे कारस्थान केले. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली, असा गैरसमज त्यांच्याकडून पसरवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र द्वेष्टे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे. या इतक्या बदनामीनंतरही आपल्या महाराष्ट्राने जून महिन्यात नव्या उदयोगधंद्यांशी 17 हजार कोटींचे करार केले. हे करार केवळ कागदावर राहणार नसून प्रत्यक्षात येतील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्रात नवी गुंतवणूक आणि उद्योगधंदे येत आहेत. त्यामुळे रोजगार निर्माण होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

तुम्ही मुंबईकरांच्या विकासात मिठाचा खडा टाकताय याची जाणीव आहे का, उद्धव ठाकरेंचा भाजप नेत्यांना टोला’
राज्य सरकारने मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जमिनीची निवड केली. ही जमीन मिठागराची असून ती केंद्राच्या मालकीची असल्याचा आता अनेकजण सांगत आहेत. मात्र, कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे, हे सांगणाऱ्यांना आपण मुंबईकरांच्या विकासाच्या मार्गात मिठाचा खडा टाकतोय, याची जाणीव नाही का, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लगावला.

‘मेट्रो प्रकल्पासाठी जर्मन कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचे कर्ज’
मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी जर्मनीच्या के. एफ. डब्ल्यू या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरो एवढ्या रकमेचे कर्ज अत्यंत माफक दरात घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यावेळी जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला उद्योगासाठी महाराष्ट्र खूप सोयीचा वाटत असल्याचे सांगितले. तसेच आम्ही महाराष्ट्राच्या विकासात तुमच्यासोबत राहू, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘मुंबईतील लोकल ट्रेन हळूहळू सुरु होतील’
मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरु होणार, याकडे डोळे लावून बसलेल्या चाकरमन्यांना उद्धव ठाकरे यांनी तुर्तास कोणताही दिलास देण्यास नकार दिला. लोकल ट्रेन सूचनेनुसार हळूहळू सुरू होत आहेत. याबाबतीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल आपल्याला चांगल्याप्रकारे सहकार्य करतील, अशी खात्री असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी रेल्वमेमंत्र्यांना चिमटा काढला.

‘दिवाळीनंतर 15 दिवस महत्वाचे, चार दिवसांतील धुरामुळे सगळी मेहनत वाया जाईल’
सुरुवातीला मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांचा आकडा मोठा होता. मात्र, आपण सगळ्यांनी आत्मविश्वासाने आणि जिद्दीने संकटाचा सामना करत कोरोनाचा आलेख खाली आणला. कोरोनाचा विषाणू हा श्वसनसंस्थेवर घातक परिणाम करतो. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण वाढल्यास कोरोनाचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्यता आहे. चार दिवसांतील फटाक्याच्या धुरामुळे आतापर्यंत घेतलेली सर्व मेहनत वाया जाईल. दिवाळीनंतरचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

‘फोर्स वन’ मधील जवानांना प्रोत्साहन भत्ता

पोलिसांच्या ‘फोर्स वन’ मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दिवाळीनंतर शाळा सुरु

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश मी दिले आहे. सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्या टप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

धार्मिकस्थळं उघडणार, दिवाळीनंतर नियमावली करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

(CM Uddhav Thackeray urges people to take care in Diwali)