दिल्ली काबीज करु… बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची पुढची वाटचाल स्पष्ट

| Updated on: Jan 23, 2022 | 9:18 PM

आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे. याचं कारण राजकारण म्हणजे गजकरण असं बाळासाहेब म्हणायचे. यांना राजकारणाचं गजकरण झालं आहे. राजकारण म्हणून ते आता काही खाजवत आहेत. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दिल्ली काबीज करु... बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची पुढची वाटचाल स्पष्ट
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : ‘दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिलं, आपण दिल्ली काबीज करु’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेची पुढील वाटचाल स्पष्ट केलीय. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

‘विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार’

शिवसैनिकांनी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर एक व्हायरस आपल्या लाटा आणत असेल, तर शिवसेनेची लाट आपण आणू शकत नाही का? दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिलं, आपण दिल्ली काबीज करु. गेल्या काही दिवसांपासून मी सक्रिय नाही. माज्या काळजी करणाऱ्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार. हे काळजीवाहू विरोधक एकेकाळी मित्र होते. आपण त्यांना पोसलं. आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे. याचं कारण राजकारण म्हणजे गजकरण असं बाळासाहेब म्हणायचे. यांना राजकारणाचं गजकरण झालं आहे. राजकारण म्हणून ते आता काही खाजवत आहेत. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सोडलं नाही’

वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं त्यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलं नाही. वापरायचं आणि टाकून द्यायचं हा भाजपचा स्वभाव आहे. हे हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलतात. सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता हवी म्हणून मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युत्ती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटाव या वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूंशी युती, हे आपलं हिंदुत्व नाही, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केलाय.

हातात बळ नसेल तर एकहाती सत्ता शक्य नाही. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणीलसारखं लढायला शिका. सत्तेचा वापर अधिक कसा करता येईल याचा विचार करा आणि काम करा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी दिलाय.

फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवरुन खोचक टोला

आम्ही लोकशाहीचा अपमान केला? तुमचं गुलाम म्हणून असलेलं स्वप्न आम्ही मोडून पाडलं, म्हणजे लोकशाहीचा अपमान. आम्ही चोरुन मारुन शपथ नाही घेतली. उजेडात शपथ घेतली.. तुम्ही दिलेलं वचन मोडलं म्हणून आम्ही नवीन घरोबा केला. सरकार फोडून आमदार फोडून तुम्ही सरकार केलं. फोडाफोडी करुन सांगायचं की बघा आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत, असे आम्ही नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

इतर बातम्या :

‘बाळासाहेब असते तर…’ कवितेच्या माध्यमातून संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा

‘स्वातंत्र्याची भीक नको’ म्हणालेल्या नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण! वाचा काय असतो होलोग्राम पुतळा?